७३ टक्के भारतीयांचा प्रवासासाठी वैयक्तिक कार वापरण्याकडे कल

मुंबई : शहरातच एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी भारतीय(indian) नागरिकांद्वारे कार्सचा वापर सर्रास केला जातो. सुमारे ७३ टक्के भारतीयांचा प्रवासासाठी वैयक्तिक कार वापरण्याकडे कल असल्याचे एमजी मोटर इंडियाच्या(MG Motor India) अर्बन मोबिलिटी हॅप्पीनेस सर्व्हेतून(Urban Mobility Happiness Survey) निदर्शनास आले आहे.

सर्व्हेक्षणात सामील ७३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी आपण दररोज किंवा अधूनमधून कामावर वा कॉलेजमध्ये जाण्यासाठी वैयक्तिक कार वापरतो असे सांगितले. याखेरीज शहरातील कार-ओनर्स घरगुती कामे, खरेदी, मित्र-नातेवाईकांच्या भेटीगाठींसाठी आणि विकेंड ट्रीप्ससाठी आपल्या गाडीचा वरचेवर उपयोग करत असल्याचेही या सर्वेक्षणातून दिसून आले.

एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर (Commercial Officer) गौरव गुप्ता म्हणाले, “अर्बन मोबिलिटी हॅप्पिनेस सर्व्हे”च्या निष्कर्षांनी आम्हाला भारतीय ग्राहकांचे वाहन चालवितानाचे वर्तन आणि वाहतुकीच्या साधनांचे त्यांच्या पसंतीचे पर्याय यांविषयी अनमोल अशी सखोल माहिती दिली. कार ओनर्स आपल्या गाडीची कामगिरी आणि वैशिष्ट्ये यांच्याबरोबरच सोय, सुरक्षितता आणि एकूणच ड्रायव्हिंगचा अनुभव या गोष्टींनाही प्राधान्य देतात ही गोष्ट या सर्वेक्षणातून स्पष्टपणे दिसून आली आहे. वाहतुकीच्या अद्ययावत उपाययोजना पुरविण्याचा ध्यास असलेला ब्रॅण्ड म्हणून आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी मेळ साधण्याचे महत्त्व आम्ही जाणतो.”

हे सर्वेक्षण अहमदाबाद, बेंगळुरू, पुणे, मुंबई, दिल्ली, एनसीआर, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता अशा ८ भारतीय शहरांमध्ये घेण्यात आले, ज्यातील बहुतांश शहरे ही तिथल्या नागरिकांना आपल्या दैनंदिन प्रवासात येणाऱ्या असंख्य अडचणींसाठी ओळखली जातात. या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या ५००० प्रतिसादकर्त्यांमध्ये १८ ते ३७ वयोगटातील व घरात किमान एक कार असलेल्या स्त्री-पुरुषांचा समावेश होता. सर्वेक्षणातून हाती आलेले निष्कर्ष पुढीलप्रमाणे:

पार्किंगसाठीच्या अपुऱ्या पायाभूत सोयीसुविधा ही सामायिक समस्या:

भारतीय शहरांतील कार ओनर्ससाठी वाहनाचे पार्किंग करणे ही एक सामायिक समस्या आहे. केवळ २६ टक्के लोकांनी आपल्याला पार्किंगची जागा सहज सापडत असल्याचे सांगितले तर इतर ७४ टक्के लोकांना मात्र आपल्या शहरातील पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि पार्किंग शोधण्याचे व्यवस्थापन याबाबतीत खूप कष्ट घ्यावे लागत असल्याचे दिसून आले. पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने आपण आपल्या कार्स न वापरण्याचा निर्णय घेतल्याचे किंवा पार्किंगच्या उपलब्धतेनुसार आपली कामे बेतून घ्यावी लागत असल्याचे सुमारे ६४ टक्के लोकांनी सांगितले.

केवळ एका सहप्रवाशासोबत प्रवास करण्याला कार ओनर्सची पसंती:

भारतीय शहरांतील बहुतांश कार ओनर्समध्ये सामायिक वाहन वापरण्याची रीत फारशी लोकप्रिय नाही. आपण आपल्या गाडीने एकटेच प्रवास करतो किंवा जास्तीत-जास्त आणखी एक सहप्रवासी सोबत घेतो असे सुमारे ७१ टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले. अवघ्या १ टक्के प्रतिसादकर्त्यांनी आपण नेहमी एकाहून अधिक सहप्रवाशांच्या सोबतीने प्रवास करत असल्याचे सांगितले.

पेट्रोलला अधिक पसंती तर विविध पॉवरट्रेनच्या पर्यायांकडेही लक्ष:

जीवाश्म इंधनाशी संबंधित पर्यावरणीय चिंता वाढत असूनही भारताच्या प्रमुख शहरांतील बऱ्यापैकी लोक अजूनही पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांना अधिक पसंती देतात. सर्वेक्षणानुसार ५० टक्के प्रतिसादकर्त्यांकडे पेट्रोल गाड्या असल्याचे तर ३५ टक्के प्रतिसादकर्त्यांकडे डिझेल गाड्या असल्याचे आढळून आले. असे असूनही कार ओनर्स पर्यायी पॉवरट्रेन तंत्रज्ञानाकडे वळण्याचा ट्रेण्ड वाढत आहे.

लगेजसाठीच्या जागेचा लॅपटॉप बॅग ठेवण्यासाठी वापर:

सर्वेक्षणांतून उघड झालेल्या माहितीनुसार सुमारे ७७ टक्के प्रतिसादकर्ते दर दिवशी आपल्या गाडीतील लगेज स्पेसचा वापर करतात. त्यापैकी ८१ टक्के लोक या लगेज स्पेसचा वापर लॅपटॉप बॅग ठेवण्यासाठी करतात.

मोठे अंतर आणि प्रवासासाठी लागणारा वेळ या गोष्टींमुळे शहरातील प्रवास दुख:दायक:

सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे ७१ टक्के सहभागींनी आपण कामावर किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी दररोज ३० मिनिटांपासून ते तासभर वेळ खर्च करत असल्याचे सांगितले. प्रवासासाठी लागणारा सरसकट वेळ पाच वर्षांपूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत वाढला असल्याचे दिसत असल्याचे ६१ टक्के लोकांनी मान्य केले.

इंधन दरवाढीचा शहरी प्रवाशांना फटका:

इंधनाच्या वाढत्या किंमतीचा देशभरात सगळीकडेच परिणाम झाला आहे आणि शहरी कार-ओनर्स त्याला अपवाद नाहीत. इंधन दरवाढीचा आपल्यावर खूप मोठा परिणाम झाल्याचे ५२ टक्के नोंदविले. तसेच आपण दर महिन्याला इंधनावर ६००० हून अधिक खर्च करत असल्याची माहिती ५० टक्के प्रतिसादकर्त्यांनी दिली.

शहरांमधील हवा आणि ध्वनीप्रदूषण चिंतेचे कारण:

हवा आणि ध्वनीप्रदूषण ह बहुतांश शहरी नागरिकांसाठी काळजीची मुख्य बाब आहे, जे सर्व्हेच्या निष्कर्षांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसून आले. शहारातील हवा प्रदूषित असल्याचे ८० टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले. तसेच तितक्याच लोकांनी हवेच्या प्रदूषणाचा मुद्दा मान्य करत आपल्या शहरात आवाजाचे प्रदूषणही खूप असल्याचे ठामपणे सांगितले. याखेरीज कार खरेदी करताना आपण पर्यावरण हा महत्त्वाचा मुद्दा म्हणून विचारात घेतो, असे मत ६९ टक्के प्रतिसादकर्त्यांनी नोंदविले.

आटोपशीर आकाराच्या स्मार्ट कार्सचा पर्याय:

भारतातील नागरी वाहतुकीसमोरील समस्यांसाठी स्मार्ट मोबिलिटी उपाययोजना हे संभाव्य उत्तर ठरू शकते, असे अनेक काळापासून म्हटले जात आहे. आटोपशीर आकाराची स्मार्ट कार घेतल्यास शहरात प्रवास करण्याचा वेळ कमी होऊ शकेल आणि दर दिवशी प्रवास करताना येणाऱ्या बऱ्याचशा अडचणी सुटू शकतील असे मत जवळ-जवळ ९० टक्के लोकांनी मांडले.