महाराष्ट्रात अमित शहांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन घडले – देवेंद्र फडणवीस  

मुंबई: ‘केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या विचार पुष्पामध्ये कोणाचेही आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. या पुस्तकाचे कोणतेही पान उघडा, तुम्हाला नक्कीच ज्ञान मिळेल, जे तुम्हाला प्रेरणा देईल. आचार्य पवन त्रिपाठी यांच्या ‘विचार पुष्प’ या (Vichar Pushp) पुस्तकातील प्रत्येक वाक्य जीवनात मार्गदर्शक आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विचार पुष्प’ पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभात त्याचे कौतुक केले.

फडणवीस म्हणाले की, अमित शहा हे पक्षासाठी समर्पित नेतृत्व आहे. भाजप अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य आपण पाहिले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून यूपीमध्ये त्यांचे कार्य आपण सर्वांनी पाहिले, जिथे भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या. याचे श्रेय कोणाला जात असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वाला आणि अमित भाईंच्या कार्याला जाते. पक्ष मजबूत करण्यासाठी ते जवळपास देशभर फिरले. प्रत्येक राज्यात त्यांनी अनेक दिवस मुक्काम केला. अमित भाई एका दिवसात ४०-४० बैठका घेऊन कार्यकर्त्यांपासून समाजातील प्रत्येक घटक आणि व्यक्तीपर्यंत पोहोचले. तसेच दोन-अडीच महिने महाराष्ट्रात राहून त्यांनी या कार्यालयातून निवडणूक प्रक्रिया हाताळली आणि भाजपचे सरकार आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि अमित भाई शहा यांच्या आत्मविश्वासामुळेच काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात यश आले, असेही फडणवीस म्हणाले. त्याचाच परिणाम म्हणून आज काश्मीर प्रगतीकडे वाटचाल करत आहे. फडणवीस म्हणाले की, अमित भाईंच्या विचारात प्रगल्भता आहे.छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि चाणक्य यांना मानणारे ते नेते आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता तर आहेच, पण निर्णय घेण्याची क्षमताही प्रचंड आहे. महाराष्ट्रात झालेला बदल तुम्ही पाहिला आहे. शिवसेनेने आमच्यासोबत जी बेईमानी केली, त्या बेईमानांना त्यांची जागा दाखवण्यात आली. अमित शहा यांच्या मार्गदर्शनामुळेच आज महाराष्ट्रात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे सरकार सत्तेवर आहे.

महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड.आशिष शेलार, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार राजहंस सिंह आणि माधवी नाईक व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले की, अमित शहा यांनी संसदेत, कार्यक्रमात आणि माध्यमांमध्ये व्यक्त केलेल्या विचारांमधून काही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक वाक्ये निवडून मी हे ‘विचार पुष्प’ तयार केले आहे. जे वाचणाऱ्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. यावेळी आचार्य पवन त्रिपाठी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ही श्वेता परुळकर यांनी सांभाळली.