राणा दांपत्यांवर कारवाई झाली ते योग्य झालं पण राज ठाकरेंवर कारवाई का केली नाही? – निरुपम

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. यातच आता राज ठाकरे यांना राज्य सरकार घाबरतं, त्यामुळेच 1 मे रोजीच्या औरंगाबादच्या सभेच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही असा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी दिला आहे.

औरंगाबादेत 12 अटींचं राज ठाकरेंनी उल्लंघन केलं. त्यावेळी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही. राणा दांपत्यांवर कारवाई झाली ते योग्य झालं पण राज ठाकरेंवर कारवाई का केली नाही? माझ्या मनात हा प्रश्न आहे की राज ठाकरेला मविआ का घाबरतंय का? राज ठाकरेंच्या कडून भावना भडकवण्याचं काम सुरू आहे. राज ठाकरेंनी हे काम केलंय, त्यामुळे कारवाई व्हायला हवी. ती होत नाही, सरकारने ही प्रक्रिया जलद गतीने करावी आणि ठोस कारवाई करावी. असं निरुपम म्हणाले.

संजय निरुपम राज ठाकरेंवर टीका करताना म्हणाले की,राज ठाकरे अयोध्याला जात आहेत, त्यामागे भाजपचा हात आहे. हिंदुत्वाचा अजेंडा चालवण्याआधी, उत्तर प्रदेश सरकारचं कौतुक करण्याआधी राज ठाकरेंनी मुंबईतील उत्तर भारतीयांची माफी मागितली पाहीजे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना मारलं, त्यांच्या मनाला ठेच पोहोचवली आहे, त्यांनी त्याबद्दल लोकांची माफी मागितली पाहिजे.