अहमदनगरचं नामांतर आता अहिल्यादेवी होळकर नगर होणार; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

अहमदनगर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवी होळकर नगर असं झालं असल्याची मोठी घोषणा केली आहे. सोबतच अहिल्यादेवींची 300 वी जयंती जोरदार साजरी केली जाणार असून होणार जयंती जगाला हेवा वाटेल अशी साजरी करु अशी देखील एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. चौंडीतील सभेत या दोन मोठ्या घोषणा त्यांनी केल्या.

नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर झाल्याची घोषणा केली.

आमच्या कार्यकाळात आणि चौंडीमधील जयंतीच्या कार्यक्रमात या निर्णयाची घोषणा केली हे आमचं भाग्य असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आहिल्यादेवी होळकर यांचे नाव हिमालयाएवढे आहे. अहिल्यादेवी यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी खूप काही केलं. अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. आमच्या सरकारच्या काळात अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय होणार असल्याने हे आमचं भाग्य आहे. आजच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आम्हाला भाग्य मिळाले. ज्यांनी इथे येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना 20 दिवसात सत्तेतून घालवून टाकण्याचे काम आम्ही केलं.