महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन

मुंबई  – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंघ, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचे संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर देशभरातून येणाऱ्या बंधू-भगिनींनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले आहे. कोरोना संकटामुळे यंदा अनेकांनी आपापल्या घरातूनच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहेत.