पक्षाच्या आदेशावरून निवडणूक लढवत होतो, पक्षाच्या आदेशावरून थांबतोय !

कोल्हापूर – अखेर कोल्हापूर विधान परीषद बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजपा उमेदवार अमल महाडीक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठांकडून अमल महाडिक यांना निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचे निर्देश आल्याने, महाडिक यांनी पक्षाचा आदेश मान्य करत अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, आता कोल्हापूर विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध होत आहे. काँग्रेसचे उमेदवार व पालकमंकत्री सतेज पाटील यांची कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत आता बिनविरोध निवड निश्चत आहे. दरम्यान, या घडामोडी घडल्यानंतर आता महाडिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, मागील अनेक वर्षं महाडिक साहेबांनी या जागेवर विधान परिषदेत प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे यंदाही तोडीस तोड म्हणून महाडिक कुटुंबातीलच उमेदवार असावा अशी पक्षाची आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार पक्षाकडून मला उमेदवारी दिली गेली. त्या अनुषंगाने आम्ही तयारीलाही लागलो होतो. पण अचानक दिल्लीतुन वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर विधानपरिषदेच्या जागा बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार मी माझा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे. उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा झाल्यापासून माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले माझे मोठे बंधू मा.खा.धनंजय महाडिक,प्रकाशआवाडे, मा.विनय कोरे, जयंत पाटील सर तसेच सर्व ज्ञात-अज्ञात नेते, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, माझ्या पक्षातील सर्व सहकारी मित्र, कुटुंबातील सर्व सदस्य व जीवापाड प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानतो. कोल्हापूरच्या जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर होतो व यापुढेही असेनच. त्यामुळे माझ्यावर, माझ्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी संयम राखून पक्षादेशाचा मान राखावा, असे आवाहन करतो.