हा तर लोकशाहीचा अपमान आहे; अमोल कोल्हे एकनाथ शिंदेंवर बरसले 

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूर मतदार संघातील विकासकामांचा आढावा नुकताच घेतला मात्र आता या आढावा बैठकीवर खासदार अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडले आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  लोकशाही पद्धतीचा नवा दुर्दैवी पायंडा पाडत आहेत. त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नांबाबत बैठक घेतली. या बैठकीला लोकांनी निवडून दिलेले खासदार, आमदार यांना आमंत्रण नव्हतं. हा लोकशाहीचा अपमान आहे, हे खेदपूर्वक म्हणावं लागत आहे.असं खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले आहेत.

केवळ राजकारण न करता शाश्वत विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. कोणाच्या तरी आश्रयाला जाऊन इथं कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, असं खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले आहेत. दरम्यान, या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

आढावा बैठकीत नेमकं काय झालं ? 

मौजे वढू-तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणेच ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ’ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अनुमती दिली. वढू-तुळापूर येथील ग्रामस्थांनी  मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समाधीस्थळ विकासाच्या विविध मागण्यांचे त्यांना निवेदन दिले. दरम्यान, जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण वनक्षेत्रात बिबट सफारी प्रकल्प तयार करण्यात येणार असून याचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

शिरूर लोकसभा मतदार संघातातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार,  वित्त विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी,  आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. अनुपकुमार यादव, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, सांस्कृतिक कार्य विभागाचे  सचिव सौरभ विजय,सचिव (सुधारणा) शैला ए. यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी वढू-तुळापूर येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. ग्रामस्थांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन या समाधीस्थळाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ करण्याची मागणी मान्य केली.

आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्प

जुन्नर तालुक्यात आंबेगव्हाण हे स्थळ बिबट सफारीसाठी अनुकूल असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा सविस्तर आराखडा तयार करावा असे निर्देश देतानाच सुमारे साडेसहाशे हेक्टर क्षेत्रापैकी शंभर ते दीडशे हेक्टर क्षेत्रावर आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्प साकारणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राजगुरुनगर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे काम ज्या जागेवर भूमिपूजन झाले आहे, त्याच ठिकाणी हे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. खानापूर येथील श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रक्रिया उद्योग कार्यन्वित  करण्यासाठी विशेष योजना तयार केल्यास हजारो कुटुंबियांना रोजगार मिळेल, असे सांगून हिरडा या औषधी वनस्पतीचे उत्पादन करणाऱ्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा सहकारी उत्पादक संस्थेचे थकीत कर्ज भरण्यासाठी २ कोटी एवढी रक्कम विशेष बाब म्हणून देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव आणण्याचे निर्देश यावेळी दिले. जुन्नर तालुक्यातील पूर येथील श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदीराच्या संरचनेचे परीक्षण करण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.