‘अमोलजी… महात्मा गांधीजींना निःशंकपणे राष्ट्रपिता मानता की नाही ?’

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये c भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. हा सिनेमा महिना अखेरिस प्रदर्शित होणार आहे. मात्र, या अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेनंतर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांनी याच मुद्यावरून एक लक्ष्यवेधी पोस्ट केली आहे. यात ते म्हणतात,  आपण महात्मा गांधीजींना निःशंकपने राष्ट्रपिता मानता काय ? 2017 साली चित्रीकरण झालेला राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या हत्येबाबतच्या चित्रपटात आपण नथुराम गोडसेच्या भूमिकेत आहात, सदर चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार असल्याचे आज माध्यमातून समजले.त्याबाबत आज गांधीप्रेमी जनतेमध्ये आपल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मी सुद्धा नाराजी व नापसंती व्यक्त करतोय कारण कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण होऊ नये या मताचा मी आहे. इथे तर राष्ट्रपित्याचा खून करणाऱ्या नथुरामाचे उदात्तीकरण करायला अनाजीपंतांच्या औलादी तेव्हापासून जिवंत आहेत हे माहीत असून तुम्ही त्या नथुराम गोडसेच्या भूमिकेत जाण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करायला हवा होता. त्यातून काय साध्य होणार याचा विचार करायला हवा होता. आमच्या बापाच्या खुनी व्यक्तीचे उदात्तीकरण आपण करू शकत नाही हे तुमच्या लक्षात यायला हवे होते. त्यासाठी त्यांचेकडे आपटे पोंक्षे होतेच की…. त्याबाबत आपण दिलेले स्पष्टीकरण सुद्धा वाचले. आपल्या म्हणण्यानुसार कलाकार आणि एक राजकीय व्यक्ती या दोन्ही भूमिका वेगळ्या आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना आहेच त्याबद्दल दुमत नाहीच. आपण व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात नथुराम गोडसे समर्थक नाहीत हे मी जाणतो. आपण पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते आहात त्याअर्थी आपण अहिंसक वृत्तीचे आहात हेही मी जाणतो.

पण आपण आता खासदार झाला आहेत आमचे लोकप्रतिनिधी आहात मी तुमचा प्रचारक व मतदार आहे. आपण जसे अभिनेते आहात तसे जबाबदार नेते सुद्धा आहात त्यामुळे आपली सार्वजनिक जीवनातील जबाबदारी व वैचारिक भूमिका खूप महत्वाची आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भुमीका आपण सुंदर अप्रतीम रीतीने पार पाडली घराघरात महाराजांचा वास्तव खरा इतिहास आपण मालिका रूपाने पोहोचवला त्यामुळे अनाजीपंत व ती प्रवृत्ती तमाम जनतेला कळली. त्याबद्दल तुमचे कौतुक आहेच.त्याच रीतीने ती अनाजीपंताची प्रवृत्ती आजही जीवंत आहे त्याच प्रवृत्तीचा वारस नथुराम गोडसे टीमने चालवला होता व गांधींच्या हत्येचे 1934 पासून विविध 6/7 प्रयत्न त्यांनी केले होते. हे आपणास माहीत असेलच.

आता तुमच्या त्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊन तो चित्रपट आगामी काळात प्रसिद्ध होणार आहे त्या चित्रपट निर्मात्यांनी व पटकथा लेखक वगैरे सर्वांनी गांधीजींच्या आचार विचारांची ,जीवन कार्याची व त्यांच्या खुनाबाबत नीट अभ्यासपूर्वक व सखोल माहिती घेतली असेल तर तो चित्रपट आलाच नसता. आपण त्यात मुख्य कलाकार आहात आपला निर्मात्यांशी करार झालेला असणार जो तुमच्यावर बंधनकारक असणार तुम्ही आता सदर चित्रपट प्रदर्शन थांबवण्यासाठी काहीच करू शकणार नाहीत असे वाटते. पण आम्ही सर्व गांधीप्रेमी त्या चित्रपटाच्या सनदशीर मार्गाने विरोधात असणार हे नक्की ! कारण गांधीजी ही व्यक्ती नव्हे तर एक महान कृतिशील विचार होता जो विचार जगभर आदर्श मानला जातोय. आजच्या ब्रिटिशांनी देखील 2015 मध्ये त्यांच्या संसदेच्या प्रांगणात गांधीजींचा भव्य पुतळा उभारला आहे , त्यातून जगाने घेतलेला संदेश मात्र आपण भारतीयांनी घेतला नाही असे वाटते.

आपण कलाकार म्हणून जरी केलेल्या भूमिकेचे अभिव्यक्तीच्या नावाखाली समर्थन करत असाल तरी पण एक राजकीय नेते म्हणून व आमचे लोकप्रतिनिधी खासदार म्हणून आपण महात्मा गांधीजींना निःशंकपणे राष्ट्रपिता मानता की नाही ? हे जगजाहीर स्पष्टीकरण द्यावेच लागेल. कारण राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना मारण्यासाठी वर्षानुवर्षे आजही दररोज विविध प्रयत्न Rss कडून सुरू आहेत पण बापू कधीच मरणार नाहीत असं विकास लवांडे यांनी म्हटले आहे.

कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?

अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते असे त्यांनी म्हटले आहे.

30 जानेवारी 1948 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली होती. दरम्यान, 30 जानेवारी या दिवसाचा धागा पकडत येत्या 30 तारखेलाच हा सिनेमाता प्रदर्शित होणार आहे. 30 जानेवारी, 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळू शकेल.