सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू – छगन भुजबळ

महापुरुषांवर गरळ ओकनाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे - विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State Opposition Leader Ajit Pawar, Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal and State President Jayant Patil) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे आज भेट घेऊन केली.दरम्यान मुंबई पोलिस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने या घटनेचा आंदोलन करुन निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, सदानंद मंडलिक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश उपाध्यक्ष सुनिता शिंदे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय सामाजिक न्याय सेल अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी आम्ही पोलीस आयुक्तांना केली आहे. मुंबई पोलिसांनी अनेक प्रकरणात काही तासात कारवाई केली आहे त्यामुळे आता या प्रकरणात देखील लक्ष घालून कडक कारवाई केली पाहिजे जर कडक कारवाई झाली नाही तर यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रात करू असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला. महापुरुषांवर गरळ ओकनाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आयुक्तांच्या भेटीवेळी केली

यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांना राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेले आहे. शरयू फौंडेशन ट्रस्ट नावाची संस्था ही “इंडिक टेल्स” ही वेबसाईट चालवते. ‘सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय’ अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखामध्ये करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.

सदर “इंडिक टेल्स” ह्या वेबसाईट वरील लेख “मुखरनीना’ ह्या नावाखाली “नीना मुखर्जी” यांनी पोस्ट केल्याचे दिसून येत असून असून सदर लेखाचे क्रेडीट हे “Bhardwajspeeks” या भारद्वाज नावाच्या व्यक्तीस दिले गेले आहे. व ह्या व्यक्तीच्या ट्विटर अकौंटवरून थ्रेडस (लेख) रुपात या वेबसाईट वर पोस्ट केल्या गेल्या आहेत. सदर भारद्वाज नावाच्या व्यक्तीचे ट्विटरः थ्रेड्स तपासले असता सदर व्यक्तीने महात्मा गांधींपासून ते इतर अनेक महनीय व्यक्तींविरुद्ध आक्षेपार्ह्य व एककल्ली लिखाण केले असल्याचे दिसून येते. तसेच सर्व संबंधित लोकांचे आणि संस्थेचे प्रोफाईल सुद्धा पत्रासोबत जोडण्यात आले आहे.

तसेच सदर कृत्य हे समाजातील महापुरुषांचा उद्देशपूर्वक अपमान करुन त्यायोगे कोणत्याही व्यक्तीला प्रक्षोभित करेल असे आहे. आणि अशा प्रक्षोभनामुळे सार्वजनिक शांततेचा भंग व्हावा, किंवा अन्य कोणताही अपराध घडावा असा त्यामागे त्याचा उद्देश आहे. तसेच विविध जाती किंवा समाज यांच्यामध्ये शत्रुत्वाची किंवा द्वेषाची भावना, किंवा दृष्टावा निर्माण व्हावा अस उद्देश आणि कृत्य हे संबंधितानी केले आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंच्या बदनामी बाबतचा हा विषय शासनाने गांभीर्याने घेवून आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’, ‘हिंदू पोस्ट’, श्री.भारद्वाज, निना मुखर्जी यांच्यावर व अशा समाजविघातक वेबसाईटवर बंदी आणावी आणि कठोर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुंबई पोलीस आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी शिष्टमंडळाला दिले.