“आम्ही हत्यार उचलले तर इथे एकही मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिला नसता”, रामदेव बाबांचे वादग्रस्त विधान

जळगाव- योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) बऱ्याचदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसले आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे हिंदू गोर बंजारा-लबाना-नायकडा समाज कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी आपले मनोगत व्यक्त करताना बाबा रामदेव यांनी असे काही वक्तव्य केले आहे, ज्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. आम्ही जर हत्यारं उचलली असती, तर आज इथे एक सुद्धा मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिला नसता, असं वादग्रस्त विधान योगगुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे.

“आम्ही जर भेदभाव केला असता, तर ख्रिश्चन धर्मीय इथे एकही पाऊल पुढे टाकू शकला नसता. जर आम्ही हत्यार उचलले असते, तर इथे एकही मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिला नसता”, असं वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

“भारतातील एकही व्यक्ती आपल्या इच्छेने मुस्लिम बनला नाही, तर जबरजस्तीने मुस्लिम बनवले आहे. आता त्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेण्याची गरज आहे. आपसातील सर्व भेदभाव विसरुन समस्त हिंदू समाजाने एकजूट होण्याची गरज आहे. एकमेकांच्या संकटात मदतीसाठी धावून जाणे हाच आपला धर्म आहे,” असं देखील बाबा रामदेव म्हणाले.

“हिंदूधर्म केवळ राष्ट्रधर्म नाही, तर हिंदुधर्म विश्वधर्म एक युगधर्म आहे. सनातन म्हणजे नित्य, शास्वत धर्म आहे. त्याला कुठलिही शक्ती मिटवू शकत नाही. ज्याप्रमाणे कुणी अग्नी, जल, वायु आणि पृथ्वीचा धर्म बदलू शकत नाही, त्याचप्रमाणे कुणीही हिंदूधर्म बदलू शकत नाही हे शास्वत सत्य आहे”, असंही बाबा रामदेव शेवटी म्हणाले.