शत्रू ज्या भाषेत बोलतो त्या भाषेतच त्याला उत्तर द्या हे देखील स्व. बाळासाहेब ठाकरे बोलले होते – निलेश राणे

Mumbai : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेत मोठे वादळ निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस शिंदे गटाला ठाकरे गटातील नेते जाऊन मिळत असल्याने हा संघर्ष आणखी वाढला असून मुद्द्यांची लढाई आता गुद्द्यांवर आली आहे. यातच काल शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्या प्रकरणी मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांना अटक केली आहे. राजेश पळसकर,चंदन साळुंके,सूरज लोखंडे, रुपेश पवार यांनाही अटक केली असून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत बोलताना भाजप नेते निलेश राणे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, आज पुण्यामध्ये एका माजी मंत्राच्या गाडीवर हल्ला झाला, विषय ज्या 25 लोकांनी हल्ला केला त्यांचा नाही पण यातून त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना धडा शिकवला नाही तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल. शत्रू ज्या भाषेत बोलतो त्या भाषेतच त्याला उत्तर द्या हे देखील स्व. बाळासाहेब ठाकरे बोलले होते.