भारत जोडो यात्रा : शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहताना वाजले फटाके, राहुल गांधीही संतापले

Buldhana – खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. दरम्यान, ही यात्रा बुलढाण्यात असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सभेदरम्यान एक विचित्र प्रकार घडला आहे. शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जात असताना दुसरीकडे काही अंतरावर फटाके फोडले जात होते.

या सभेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी सभेदरम्यान, कृषी कायद्यांना विरोध करताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राहुल गांधी मंचावर उभे राहिले होते. मात्र एकीकडे काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटे शांतपणे उभे राहिलेले असताना दुसरीकडे सभेपासून काही अंतरावर फटाके फोडण्यात आले.