मुख्यमंत्री पदाचा कार्यभार मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे देण्याची भाजपची मागणी

मुंबई : कोरोना काळात घरातून कामकाज करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची आता चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मणक्याच्या दुखण्यामुळे त्रस्त आहेत.दरम्यान, उद्धव ठाकरे हे आजारपणामुळे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार की नाही, यावर बरीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विशेष म्हणजे जनतेची अनेक कामे मुख्यमंत्र्यांच्या आजारपणामुळे खोळंबली असल्याचे चित्र असल्याने विरोधक आता मुख्यमंत्री पदाचा चार्ज दुसऱ्याकडे देण्याची मागणी करू लागले आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, राज्याचा कारभार मागील दिड महिन्यापासून अधांतरी आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी आराम करावा व मुख्यमंत्री पदाचा कार्यभार आदित्य ठाकरे यांच्याकडे किंवा मा. अजितदादा पवार यांच्याकडे द्यावा! अशी मागणी लाड यांनी केली आहे.

दुसऱ्या बाजूला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे ते गैरहजर असणे स्वाभाविक आहे. आमच्या एवढाच आग्रह असा आहे की, परंपरेनुसार तुम्ही कुणाला तरी चार्ज द्यावा. त्याची प्रोसेस लंबी आहे. त्यासाठी चार्ज राज्यपालांकडे रजिस्टर करावा लागतो. तुम्ही राज्यपालांना कितीही मानायचं नाही ठरवलं तरी सुद्धा राज्यपालाशिवाय काहीही करता येत नाही. त्यांचा अन्य दोन सहकाऱ्यांसोबतचा अविश्वास स्वाभाविकच आहे. कारण त्यांनी तो चार्ज घेतला, तर सोडणारच नाहीत. त्यांच्या जर पार्टीतही कोणाकडे विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देवून त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या. आदित्य ठाकरेंनाही ते चार्ज देवू शकतात. आदित्य ठाकरेंकडे चार्ज दिला पाहिजे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.