‘अभाविपच्या माध्यमातून भाजप आपल्या धर्मनिरपेक्ष शैक्षणिक संस्थांचे सांप्रदायिकीकरण करत आहे’

मुंबई – अभाविपच्या ( ABVP )माध्यमातून भाजप आपल्या धर्मनिरपेक्ष शैक्षणिक संस्थांचे सांप्रदायिकीकरण करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे ( Mahesh Tapase ) यांनी केला आहे.दरम्यान जेएनयू कॅम्पसमध्ये ( JNU Campus ) झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा महेश तपासे यांनी तीव्र निषेध केला आहे. अभाविपचे स्वयंसेवक हे त्यांच्या उजव्या विचारसरणीची विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांवर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्थेचीच धर्मनिरपेक्ष चौकट कमकुवत करण्याचा हा थेट प्रयत्न आहे असेही महेश तपासे म्हणाले.

भारतातील विद्यापीठांनी देशाला अभिमान वाटावे असे अनेक उत्कृष्ट नेते, शास्त्रज्ञ, प्रशासक निर्माण केले आहेत. सहकारी विद्यार्थ्यांच्या चालीरीती किंवा खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडीकडे दुर्लक्ष करून ते एकाच कॅम्पसमध्ये राहिले याची आठवणही महेश तपासे यांनी यानिमित्ताने करून दिली आहे.

त्या काळात प्रत्येकाचा समानतेच्या तत्त्वावर विश्वास होता आणि त्यामुळे कोणीही संपूर्ण समाजावर कोणत्याही विशिष्ट रूढी किंवा धार्मिक सिद्धांताची सक्ती करू शकत नव्हते. मात्र सध्या भाजपचे स्वयंसेवक शांततापूर्ण व्यवहारात अडथळा आणण्यासाठीच प्रतिक्रिया देत असतात अशी टीकाही महेश तपासे यांनी केली. भाजपला सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे आणि भारतीय राज्यघटनेची पूर्ण अवहेलना करून देशात हुकूमशाही, बहुसंख्य शासन आणायचे आहे असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

अभाविपने सुरू केलेल्या हिंसाचाराच्या घटना ही विद्यार्थी समुदायाला घाबरवण्याच्या आणि ध्रुवीकरण करण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे. विद्यार्थ्यांनी काय खावे, काय परिधान करावे, कसे वागावे हे भाजपचे कार्यकर्ते कसे ठरवू इच्छितात असा सवाल करतानाच या घटना अत्यंत लाजिरवाण्या आहेत अशी खंत महेश तपासे यांनी व्यक्त केली.