अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून भाजपने मिसळला मनसेच्या सुरात सूर, अली दारूवाला म्हणाले,…

Mumbai –  मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माहिमच्या समुद्रात अवैध दर्गा उभारण्यात आल्याचं सांगितलं. ‘दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे’, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. तसंच येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला.

राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर मुंबई महापालिका, मुंबई जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सक्रिय झाले आहे. आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडून मजार तोडण्यासाठी बीएमसीच्या मदतीने पोलिसांच्या फौजफाटासह कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. आज सकाळी 8 वाजता पोलीस, जिल्हाधिकारी प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन ही कारवाई सुरु केली. कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

एका बाजूला हे सर्व होत असताना दुसऱ्या बाजूला भाजपकडून (BJP) या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया आली आहे. भाजप प्रवक्ते आली दारूवाला (Ali Daruwala) म्हणाले, जिथे-जिथे कुठलही अतिक्रमण असेल ते अतिक्रमण तातडीने सरकारने काढलं पाहिजे. समाजामध्ये कुठलंही वैर निर्माण होणार नाही याची हे सरकार काळजी घेईल कारण देवेंद्रजी, एकनाथजी दोघेही संवेदनशील आहेत असं ते म्हणाले. सोबतच कोणीही धर्मांत तेढ निर्माण करण्याचं कारण नाही, एखादे अतिक्रमण असेल आणि ते अतिक्रमण काढायला सांगितलं याचा अर्थ तेढ निर्माण करणं असा होत नाही.असं देखील त्यांनी म्हटले आहे.