दंगली घडवून राजकारण करायचं आणि निवडणुका लढायच्या हे तंत्र भाजपचे आहे – संजय राऊत

मुंबई – काही संघटनांनी आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात काल कोल्हापूर बंदची हाक दिली होती. यादरम्यान काही परिसरात तणाव निर्माण झाला. जमावानं वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूर सोडला. सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती पसरु नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं मोबाईल कंपन्यांना दिले आहेत.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील तणावाची परिस्थिती आता नियंत्रणात असून नागरिकांनी सोशल मिडियाव्दारे पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar) यांनी केलं आहे. जिल्ह्यात येत्या 19 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश आहेत.

एका बाजूला प्रशासन शांतता राखण्याचे प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोप काही थांबत नसल्याचे चित्र आहे. यातच आता वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे खासदार संजय राऊत यांनी आगीत तेल ओतण्याचे काम सुरु केले आहे. या मुद्द्यावरून नेहमीप्रमाणे सरकारवर त्यांनी टीका केली असून कोल्हापूर सारख्या शहरात दंगल होणं हे महाराष्ट्राला शोभणार नाही. दंगली घडवून राजकारण करायचं आणि लोकांमध्ये, समाजामध्ये दरी निर्माण करुन निवडणुका लढायच्या हे तंत्र भाजपचे आहे.असं त्यांनी म्हटले आहे.

जेव्हा पायाखालची वाळू सरकते तेव्हा त्यांना बजरंगबली आठवतात. हनुमान चालीसा आठवते. कर्नाटकात काहीच चालले नाही, शेवटी त्यांना औरंगजेब आणि टिपू सुलतान यांना शरण जावे लागले असं मला वाटते, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.