BSNL SIM Card | सध्या मोबाईल काळाची गरज बनला आहे. पूर्वी मोबाईल असणं हे श्रीमंतांचं लक्षण मानलं जायचं. परंतु आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. कुणाला बोलायचं असेल, कार्यक्रमाचं आमंत्रण द्यायचं असेल, पेमेंट करायची असेल, गॅस बुक करायचा असेल, लाईटबिल भरायचं असेल, अशी प्रत्येक छोटी-मोठी कामे हल्ली मोबाईलविना करणं अशक्य आहे. पण आता मोबाईल वापरण देखील खूप खर्चिक बनलंय. सुरुवातीला १०-२० रुपयांचे वाउचर टाकल्यास महिनाभर कॉलिंगची चिंता नसायची. पण आता टॉकटाइम आणि इंटरनेटसाठी भरपूर पैसे मोजावे लागतायत. त्यातही ३ जुलैपासून जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एटरटेल या प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये २५ टक्क्यांनी वाढ केल्याने युझर्सच्या खिशावरील भार वाढलाय. जिओ, एयरटेल आणि व्हीआयचे प्रसिद्ध रिचार्ज प्लॅन ३०-५० रुपयांनी वाढलेत. त्यामुळे मोबाईल युजर्स आता बीएसएनएलकडे वळू लागलेत. पण जिओ, एयरटेल, व्हीआयने त्यांच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये वाढ का केली आणि याचा बीएसएनएलवर काय परिणाम झालाय?, याबद्दलची माहिती आपण घेऊयात…
तुम्ही सोशल मीडियावर BSNL ki wapsi, BSNL me port kro हे हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये आल्याचे पाहिले असेल. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाल्यास, जिओ-एयरटेलमुळे बीएसएनएलचे अच्छे दिन परत आलेत. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, गेल्या ११ दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये बीएसएनलचे दीड लाख सिम कार्ड विकले गेलेत. तर १२ हजार लोकांनी त्यांचे सिमकार्ड बीएसएनएलमध्ये पोर्ट (BSNL SIM Card )केलेत. जून महिन्यात हा आकडा केवळ ३ हाजारांच्या जवळपास होता.
तसेच लाइव्ह हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, बिहारमध्ये दररोज बीएसएनएलचे ८ ते १० हजार सीम कार्ड विकत घेतले जात आहेत. मागील आठवड्यांत तब्बल ३० हजार नवे ग्राहक बीएसएमएनएलशी जोडले गेलेत. पण इतक्या महिन्यांपासून कुणाच्या ध्यानीमनीही नसणाऱ्य़ा बीएसएनएल कंपनीचा अचानक इतका का भाव वाढलाय? तर यासाठी जीओ-एयरटेल-वोडाफोन कंपनी कारणीभूत आहे. या प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्य़ा रिचार्ज प्लॅन्समध्ये २०-२५ टक्क्यांनी वाढ केलीय. दुसरीकडे जीओ-एयरटेल-वोडाफोनच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन्स फारच स्वस्त आहेत.
याबद्दलची डिटेल माहिती पाहूया..
रिलायन्स जिओने त्यांच्या प्रीपेड आणि पोस्ट पेड रिचार्ज प्लॅन्सची किंमत वाढवलीय. जिओचा १५५ रुपयांचा प्लॅन १८९ रुपये झालाय.
२९९ रुपयांचा प्लॅन वाढून ३४९ रुपये झालाय
४७९ रुपयांचा प्लॅन वाढून ५७९ रुपये झालाय
पण या झाल्या काही प्रसिद्ध प्लॅन्सच्या किंमती. जिओच्या सर्व प्लॅन्सचे आकडे तुम्ही स्क्रिनवर पाहू शकता. त्यानुसार तुम्हाला समजेल की, जिओच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये ३४ रुपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंतची वाढ झालीय. जिओबरोबरच एयरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या रिचार्जच्या किंमतीही वाढून सारख्याच झाल्या आहेत. या प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी हा निर्णय घेण्यामागचे कारण आहे, ARPU .. ARPU म्हणजे Average revenue per user .. यापूर्वी प्रत्येक युजरच्या मागे जिओ-एयरटेल-वोडाफोन आईडियाला २०० रुपये मिळायचे. परंतु या कंपन्या आता ५जी सेवा प्रदान करत असल्याने त्यांचा खर्चही वाढलाय. त्यामुळे त्यांनी ARPU वाढवून ३०० रुपये करायचे ठरवले आहे. त्यामुळे रिचार्ज प्लॅन्समध्ये वाढ केली असल्याचे एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे.
दुसरीकडे बीएसएनएल अर्थात भारत निगम संचार लिमिटेड या टेलिकॉम कंपनीचे रिचार्ज प्लॅन्स तुलनेने फारच स्वस्त आहेत. बीएसएनएलच्या १०७ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ३५ दिवसांचा रिचार्ज आणि ३ जीबी डेटा मिळतो. तर १०८ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांचा रिचार्ज आणि १ जीबी डेटा मिळतो. १ वर्षांचा प्लॅन केवळ १९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याच कारणामुळे जिओ,एयरटेल, व्हीआयचे ग्राहक बीएसएनएलकडे वळू लागलेत.
परंतु भारत सरकारच्या मालकीची बीएसएनएल टेलिकॉम कंपनी, अजूनही नेटवर्क सर्व्हिसच्या बाबतीत खूप मागे आहे. जिथे जिओ-एयरटेल-व्हीआय अनलिमिटेड ५जी सेवा पुरवतेय. त्या काळात बीएसएनएल अजूनही ४जी सेवाच देत आहे. त्यातही बीएसएनएलचे टावर फार कमी भागात आहेत, त्यामुळे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात बीएसएनएलची सेवा चालत नाही. त्यामुळे आता बीएसएनएल वाढत्या युझर्सचा भार झेपवू शकेल की नाही?, हे पाहावे लागेल…
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप