चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे – उद्धव ठाकरे 

Rahul Gandhi :  सूरत न्यायालयाने गुरुवारी (23 मार्च) वायनाडमधील काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ‘मोदी’ आडनावाबाबत बदनामी प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हा निकाल देताना न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे.  यातच आता राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत राहुल गांधी म्हणाले होते की सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे? या कमेंटवरून बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी या टिप्पणीवर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधींचे वक्तव्य संपूर्ण मोदी समाजाचा अपमान करणारे असून संपूर्ण मोदी समाजाची बदनामी करणारे आहे, असे म्हटले होते.

दरम्यान, आता या मुद्द्यावर ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रतिक्रिया आली आहे. यात ते म्हणतात, राहुल गांधी यांची खासदारकी अखेर रद्द करण्यात आली.. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाही चे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत.. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे.. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल.. असं ठाकरेंनी म्हटले आहे.