दिपावली सण उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लातूर- दि.02 ते 06 नोव्हेंबर 2021 दरम्यान दिपावली उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोवीड-19 रोगांचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्व धर्मीय सण / उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रीत न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी अजूनही कोरोनाची धोका कायम आहे.त्यामुळे नागरिकांनी मोठया प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना पूढील प्रमाणे आहे.

जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी.पी. लातूर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपूर्ण लातूर जिल्हयाच्या हद्दीत दिनांक 2 नोव्हेंबर ते 06 नोव्हेंबर 2021 दरम्यान साजरी करावयाच्या दिपावली उत्सवा संदर्भात पूढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.

कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक दिनांक 04 जून 2021 सार्वजनिक आरोग्य विभाग आदेश दिनांक 11 ऑगस्ट 2021 तसेच दिनांक 24 सप्टेंबर 2021 अन्वये “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. कोवीड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.

दिपावली उत्सवा दरम्यान कपडे / फटाके / दागदागिने व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी दुकानांत व रस्त्यावर गर्दी होत असते. तथापि, नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग / संक्रमण वाढणार नाही.

दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठया प्रमाणावर फटाक्यांची अतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांचा तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरीकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा.

सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक 24 सप्टेंबर 2021 अन्वये “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी मोठया प्रमाणावर एकत्रीत येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करतांना सदर मार्गदर्शक सुचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क,फेसबुक इत्यादी माध्यमांव्दारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.

सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे (रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठया प्रमाणावर एकत्रीत येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी.

मा. सर्वोच्च नयायालयाच्या रिट पिटीशन (सिव्हिल अपिल) क्र. 728/ 2015 (निर्णय दिनांक 23 ऑक्टोबर 2018) तसेच सिव्हिल अपिल क्र. 2865-2867/2021 (निर्णय दिनांक 23.7.2021) मधील आदेशाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

कोविड-19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका,पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधकनकारक राहील.तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपापलन करावे.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पानल न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षसे पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही असे ही आदेशात नमुद केले आहे.