निवडणुका जवळ आल्या की भाजपचे ओबीसी प्रेम जागे होते; छगन भुजबळ यांचा विरोधकांवर निशाणा

बीड – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रत्येक पातळ्यांवर लढत आहोत. विरोधक मात्र विरोधाला विरोध करायचा म्हणून आंदोलने उभी करत आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाचे देखील आम्ही स्वागत करतो मात्र ओबीसी आरक्षणासाठी इथे जन जागरण करण्यापेक्षा ओबीसी समाजाला घटनात्मक आरक्षण मिळावे यासाठी दिल्ली सरकार समोर जागरण घाला असे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणास संरक्षण दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आणि सदरील अध्यादेश काढण्यासाठी सातत्यपुर्वक पाठपुरावा करणारे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात राष्ट्रवादी पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर,आमदार संजय दौंड राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,बापू भुजबळ,माजी आमदार पृथ्वीराज साठे, उषाताई दराडे,महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे,गणेश जगताप, चक्रधर उगले, प्रितेश गवळी, नवनाथ वाघमारे,अर्जुन दळे,कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्यासह बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा इतिहास जनतेला सांगितला. सुरवातीपासून ओबीसी समाजाला संघर्ष करावा लागला आहे. मंडल आयोगाला मान्यता मिळाल्यानंतर २०१० साली सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला त्यात ट्रिपल टेस्ट मांडल्या आणि इंपिरिकल डाटाची मागणी केली. २०१७ पर्यंत याबाबत काहीच घडले नाही २०१७ साली एक व्यक्ती कोर्टत गेला आणि कोर्टाने इंपिरिकल डाटाची मागणी केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये होते त्यांनी देखीक एक अध्यादेश काढला आणि दुसऱ्याच दिवशी इंपिरिकल डाटा केंद्राकडे मागितला आणि त्यांना देखील तो डाटा दिला गेला नाही. ज्यावेळी संसदेत समीर भुजबळ यांनी ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली होती. त्याला खुद्द स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी पक्षाचा विचार न करता त्यांना पाठींबा दिला. आणि ओबीसींची जनगणना झाली मात्र हा डाटा जनतेसमोर मांडला नाही. ह्या डाटात खूप चुका आहेत असे केंद्र सरकार सांगते याच्या दुरुस्तीसाठी अरविंद पनघडिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली मात्र त्याला सदस्य नेमलेच नाही त्यांनी देखील मग ह्या पदाचा राजीनामा देऊन टाकला. मग ह्या डाटातल्या चुका केंद्राने का दुरुस्त केल्या नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुढे छगन भुजबळ म्हणाले की निवडणुका जवळ आल्या की भाजपचे ओबीसी प्रेम जागे होते मात्र ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भाजपाचेच लोक कोर्टात जातात भाजपाचे राहुल रमेश वाघ ,भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस हे अध्यादेशाच्या विरुद्ध कोर्टात गेले आहेत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी जनतेला दिली.

यावेळी बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, बीड जिल्ह्यात विशेषतः परळी मध्ये जेंव्हा आलो तेंव्हा माझें जंगी स्वागत करण्यात आले या जनतेचे प्रेम पाहून मी भारावून गेलो. या प्रेमाचा उतराई कसा होऊ हे कळत नाही अश्या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिह्याचे पालकमंत्री या नात्याने मंत्री छगन भुजबळ यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की मी यावेळी मा. छगन भुजबळ साहेब यांचा प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मधल्या काळात समाजावर जे संकट आलं त्या संकटामध्ये आपण सर्वांनी एक भूमिका घेतली आणि यातून मार्ग काढला आणि हा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला तो फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांनी मधल्या काळात ओबीसी आरक्षणावर चर्चा झाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले म्हणून महाविकास आघाडीवर टीका झाली मात्र हे आरक्षण ज्यांनी घालवले तेच लोक आज आमच्यावर टीका करत आहेत. या आरक्षणाची सत्यता, हा प्रश्न केंव्हा सुरू झाला, कोणाच्या काळात या प्रकरणाची केस सुरू झाली याचे पुरावे छगन भुजबळ यांनी मांडले होते.

मंडल आयोगासाठी भुजबळ साहेबांनी संघर्ष केला राज्यात मुख्यमंत्री म्हणून शरद पवार साहेब होते. त्यावेळी भुजबळ साहेबांनी पवार साहेबांकडे मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. आणि लगेच एक महिन्याच्या आत मंडल आयोग लागू करण्यात आला. त्यामुळे फक्त अध्यादेश काढला म्हणून नाही तर ५५ वर्ष समाजकारणासाठी भुजबळ साहेब यांनी दिले आहेत यासाठी भुजबळ साहेब यांची कृतज्ञता व्यक्त करतो अश्या भावना व्यक्त केल्या. या काळात अनेक संकटे आली त्या संकटांच्या आम्ही सावली सारखे त्यांच्या सोबत होते अशी आठवण देखील मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितली.