छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी त्यामध्ये चोंबडेपणा करू नये – राऊत
कोल्हापूर – राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेत मोठा आरोप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शब्द मोडला, असा दावा छत्रपती संभाजी राजे यांनी केला. पुढील स्थिती पाहता आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही माघार नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे.
संभाजीराजेंच्या या आरोपामुळे शिवसेना संभाजीराजे समर्थक आणि भाजपच्या निशाण्यावर आली आहे. राजेंनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेवर टीका होऊ लागल्यानंतर आता शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरमधून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी त्यामध्ये चोंबडेपणा करू नये, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
आमच्यासाठी संभाजीराजेंच्या उमेदवारीचा विषय संपल्याचे राऊत म्हणाले. या राज्यात विरोधी पक्ष आहे पण ते विरोधासाठी विरोध करताना दिसत आहे. एखादा निर्णय घेतला की त्यावर टीका करायची हे त्यांनी ठरवलं आहे. यातून त्यांना कोणता असुरी आनंद मिळतो काय माहीत नाही, पण त्याची पर्वा न करता महाविकास आघाडी ठामपणे पुढे चालली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते.