पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे छत्तीसगड (Chhattisgarh) राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल (Bhupesh Baghel) यांचे स्वागत करण्यात आले. क्रांतीसूर्य, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान शहराध्यक्ष रमेश बागवे व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव, पश्चिम महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल (Sonal Patel) यांच्या हस्ते करण्यात आला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री भुपेश बघेल म्हणाले की, ‘‘पुणे हे छत्रपती शिवाजीमहाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले यांची जन्मभूमी आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत पुण्याचे मोठे योगदान आहे. आपण सर्वांनी मला या ऐतिहासिक काँग्रेस भवनमध्ये बोलावून माझा सत्कार केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी या ऐतिहासिक वास्तूला ‘‘यह मकान सच्चे खिदमतगार/सेवको का बना रहे’’ असा शुभसंदेश दिला होता. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे. काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे आज देशाची प्रगती झाली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सभासद नोंदणी अभियान देशभर राबविले जात आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी या सभासद नोंदणी अभियानामध्ये भाग घेवून जास्तीत जास्त सभासद नोंदवावे. पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देश मजबूत करण्यासाठी अनेक धाडसी पाऊल उचलले. लाल बहाद्दूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसानचा नारा दिला. स्व. इंदिराजी गांधी यांनी गरीबी हटावचा नारा दिला आणि देशात हरित क्रांती घडविली. राजीव गांधी, नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टीकोनामुळे आज भारत प्रगतशील देश आहे. मोदी सरकारच्या राजवटीत जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण झालेली आहे. राहुल गांधी यांनी नोटबंदीवर टिका केली होती. त्यांनी सांगितले होते की नोटबंदीमुळे देशाचे फार मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस पक्षाने जी.एस.टी.च्या चूकीच्या पध्दतीने केलेल्या अमंलबजावणीला विरोध केला होता. राहुल गांधींनी मोदी सरकारला कोरोना संसर्ग बद्दल संवेदनशील राहण्यास सांगतिले होते परंतु मोदी सरकारने त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याची किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागली.
उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाची राजवट आहे आणि पंतप्रधान मोदी वाराणसी येथून खासदार म्हणून निवडून आले आहेत. असे असताना सुध्दा कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्यांचे शव योग्यरितीने अंतसंस्कार न करता गंगेमध्ये फेकून दिले गेले होते ही बाब एक शोकांतिका आहे. खाजगीकरणाच्या नावाखाली सरकारी कार्यालय आणि कारखाने मोदी सरकारने विकायला काढलेले आहेत. बेरोजगार व महागाई आज देशातील ज्वलंत समस्या आहे. या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी देशभर आंदोलन करीत आहे. १२ डिसेंबर २०२१ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तर्फे मोदी सरकारने केलेल्या महागाई विरोधात दिल्लीमध्ये मोठी रॅली आयोजित केली आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांचे हाथ मजबूत करण्यासाठी आपण सर्व काँग्रेसजणांनी काँग्रेस पक्षाचे कार्य समाजातील सर्व घटकांमध्ये पोहचवून मोदी सरकारच्या चूकीची आर्थिक धोरणाबद्दल जनतेमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.’’
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘छत्तीसगड मध्ये १५ वर्ष भारतीय जनता पक्षाचे राज्य होते. भुपेशजी बघेल प्रांताध्यक्ष असताना छत्तीसगड राज्यातील सर्व तालुका व शहरात जावून संघटनेची बांधणी केली. जनतेमध्ये भारतीय जनतापक्षाच्या बेताल कारभाराबद्दल जनजागरण केले. प्रसार माध्यमांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षच सत्तेवर येणार परंतु भुपेशजी बाघेल यांनी त्यांचा अंदाज चुकीचा ठरवला. काँग्रेस पक्षाला छत्तीसगडच्या जनतेने स्पष्ट बहुमत दिले आणि काँग्रेस पक्ष सत्तेवर आला.’’
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘भुपेशजी बघेल हे काँग्रेसचे निष्ठावान नेते आहेत. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे छत्तीसगड येथे काँग्रेस पक्ष सत्तेवर आला. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांची निघृण हत्या झाली. त्या हत्तेचा निषेध करून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भुपेशजी बघेल उत्तर प्रदेशात गेले. उत्तर प्रदेश सरकारने त्यांना लखीमपुर जाण्यास मनाई केली तेव्हा त्यांनी लखनौ विमानतळावरच उपोषण केले.’’
ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार म्हणाले की, ‘‘भुपेशजी बघेल यांनी काँग्रेसचा विचार आणि ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहचविले. त्यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार मजबूत आहे. त्यांनी छत्तीसगडच्या जनतेसाठी शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. छत्तीसगडचा विकास हेच त्यांचे ध्येय आहे. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे. गांधींना जेव्हा महात्मा म्हणून उपमा दिली त्यावेळी ते म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले हे खरे महात्मा आहेत.’’
हे देखील पहा
https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM