उद्धव ठाकरेंकडून सुपारी घेऊन अफवा पसरवणा-या तथाकथित घटनातज्ञांवर गुन्हा दाखल करा – वाघ 

Mumbai – राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निकाल काल जाहीर झाला. त्यानुसार राज्यातल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठा दिलासा मिळाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी विश्वास दर्शक ठरावाला सामोरं न जाता स्वतःहून पदाचा राजीनामा दिला; त्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचा राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवला आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत निकाल द्यावा, अशी सूचनाही; सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा (Chief Justice Justice Dhananjay Chandrachud, Justice M. R. Shah, Justice Krishna Murari, Justice Hima Kohli and Justice P. S. Narasimha) यांच्या घटनापीठाने केली.

बहुमत चाचणी घेण्यासाठी राज्यपालांकडे कुठलेही ठोस पुरावे नव्हते. विरोधी पक्षांनी कुठलाही अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला नव्हता. त्यामुळं राज्यपालांनी याप्रकरणी घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचं निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. विधीमंडळ पक्ष नव्हे तर राजकीय पक्षाला प्रतोद नेमण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं निकालात स्पष्ट केलं. त्यामुळं शिंदे गटानं भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नेमणूक चुकीची असल्याचं निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

दरम्यान, या निकालानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत मात्र भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी एक लक्ष्यवेधी मागणी केली आहे. उद्धव ठाकरेंकडून सुपारी घेऊन अफवा पसरवणा-या तथाकथित घटनातज्ञांवर सर्वात आधी गुन्हा दाखल करायला पाहीजे… अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकार पाडण्याचा कट आखणा-यांचा करेक्ट कार्यक्रम झालाय… असा टोला देखील त्यांनी आपल्या ट्वीटमधून लगावला आहे.