मार्च ते मे महिन्यादरम्यान भारताच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता – हवामान विभाग

नवी दिल्ली – 2023 च्या मार्च ते मे महिन्यादरम्यान भारताच्या मध्य आणि वायव्य भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र मध्य भारतात मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटेचा धोका संभवत नसल्याचं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. सी. भान यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

मार्च ते मे या तीन महिन्यांमध्ये दक्षिण भारत वगळता सर्वत्र सरासरी किमान तापमानापेक्षा अधिक तापमान संभवत असल्याचंही ते म्हणाले. 2023 च्या फेब्रुवारीमध्ये सरासरी कमाल तापमान 29 पूर्णांक 54 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. 1901 पासूनचं हे उच्चांकी तापमान आहे. फेब्रुवारी महिन्यात 68 टक्के कमी पाऊस झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान देशाच्या काही भागांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त तापमान पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आरोग्य विभाग आणि आरोग्य सुविधांनी उष्णतेशी संबंधित आजारांच्या उपचारांसाठी तयार राहावं, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.