‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या आश्वासनाची मुख्यमंत्र्यांनी पूर्तता करावी’

मुंबई – भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे(b.r. Ambedkar)परेल दामोदर हॉल जवळील बी आय टी चाळीतील खोली क्र.50 आणि 51 या ऐतिहासिक निवासस्थानी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भेट देऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी रामदास आठवले(Ramdas aathvale) यांच्या समवेत रिपाइं(rpi) चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी ही निवासस्थानी भेट दिली

सातारा येथुन 1912 मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांसमवेत मुंबईत परेल येथील निवासस्थानी राहावयास आले. सन 1912 ते सन 1934 पर्यंत 22 वर्षे डॉ.बाबासाहेब आंबेडकर या निवासस्थानी राहिले. या निवासस्थानी छत्रपती शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली होती. त्यामुळे या ऐतिहासिक निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी आंबेडकरी जनतेतुन होत आहे.याबाबत 2 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परेल मधील या निवसस्थानाला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक करणार असल्याची घोषणा केली होती.मात्र ही घोषणा हवेत विरली.

प्रत्यक्षात राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत राज्य सरकार कडून कोणतीही हालचाल करण्यात आली नाही.याबाबत चा निश्चित स्वरूप स्पष्ट करणारा शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला नाही.त्यामुळे या निवसस्थानाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंतीचा उत्सव सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आज दि.15 एप्रिल रोजी रामदास आठवले यांनी भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक करण्याच्या आश्वासनाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुर्लक्ष झाले असून या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक करण्याची पूर्तता करावी तसेच पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय स्मारकासाठी 50 कोटी निधीची तरतूद करावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या बी आय टी चाळ इमारत 100 वर्षांहून अधिक जुनी असून ही इमारत हेरीटेज दर्जाची आहे. या संपूर्ण इमारतीला हेरिटेज दर्जा देऊन इमारत राष्ट्रीय स्मारक करावी. त्यातील 80 कुटूंबांचे परेल मध्येच पुनवर्सन करावे अशी येथील स्थानिक रहिवासीयांची मागणी आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या खोली क्र.50 मध्ये समता सैनिक दलाचे कमांडर दिवंगत कालिदास सखाराम ताडीलकर यांचे कुटुंबीय निवेदिता ताडीलकर कुटुंब राहत असून क्र 51 च्या खोली मध्ये मुकुंदराव आंबेडकरांचे नातेवाईक भागूराम खैरे कुटुंब राहत आहे. या ऐतिहासिक इमारतीमधील रहिवासीयांचे बी आय टी चाळ समूह पुनर्विकासात पुनर्वसन करावे यासाठी राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी लवकरच बैठक घेणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.यावेळी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सचिनभाई मोहिते,ऍड.आशाताई लांडगे, गौतम गायकवाड,आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

खोली क्र.50 आणि रामदास आठवले

परेल येथील बी आय टी चाळीतील खोली क्र.50 हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान होते.पिता रामजीबाबा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना 50 क्रमांकाची खोली खास त्यांना अभ्यास करण्यासाठी घेतली होती.खोली क्र 51 चा स्वयंपाकघर म्हणून माता रमाई वापर करीत असत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच 50 क्रमांकाच्या खोलीत अभ्यास केला आणि अनेक क्रांतिकारी कार्य केले.50 नंबर च्या खोलीशी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचेही भावनिक अनोखे नाते आहे. योगायोग आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्या खोलीत राहिले आणि आपले प्रारंभिक क्रांतीकारी काम करू शकले त्या खोलीचा क्रमांक 50 असून केंद्रीय राज्यमंत्री  रामदास आठवले जेंव्हा शिक्षणासाठी मुंबईत आले त्यांना सिद्धार्थ विहार वसतिगृहात अभ्यासासाठी आणि राहण्यासाठी जी खोली मिळाली त्याचा क्रमांक 50 होता.दलित पँथर आणि भारतीय दलित पँथरच्या संघर्षमय क्रांतिकारी काळात संपूर्ण देशात वडाळा येथील सिद्धार्थ विहार वसतीगृहाची 50 क्रमांकाची खोली प्रसिद्ध होती.रामदास आठवले यांचे 50 क्रमांकाची ती खोली भारतीय दलित पँथर (dalit panther) चे केंद्रस्थान झाली होती याची आठवण आज परेल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 50 क्रमांकाच्या खोलीला भेट दिल्यानंतर व्यक्त केली.