‘प्रादेशिक पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जनतेने बळ देऊन विधानसभा आणि लोकसभेत पाठवले पाहिजे’

पुणे : राष्ट्रीय पक्षांना तळागाळातील प्रश्न समजण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी फार वेळ लागतो. त्याऐवजी प्रादेशिक पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जनतेने बळ देऊन विधानसभा आणि लोकसभेत पाठवले पाहिजे. देशातील प्रादेशिक पक्ष मजबूत झाले तरच या देशातील लोकशाही अधिक बळकटपणे टिकून राहू शकेल, अशी भावना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे, इम्तियाज जलील आणि रामदास तडस यांना यावेळी आदर्श खासदार पुरस्कार, नगरसेवक वसंत मोरे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार तर जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने  महादेव जानकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.

महादेव जानकर म्हणाले, पैसा आणि घराणेशाही नसली तरीही सर्वसामान्य माणूस राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो हा आत्मविश्वास युवा संसद सारख्या उपक्रमाच्या  माध्यमातून तरुणांमध्ये निर्माण होतो. तरुणच या देशाचे उज्वल भवितव्य घडविणार आहे.