महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय क्रांतीकारी! : नाना पटोले

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंकाजी गांधी यांची घोषणा ही महिलांना समान संधी व सन्मान देण्यासाठी टाकलेले क्रांतीकारी पाऊल आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या ऐतिहासीक निर्णयाचे स्वागत करत आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्व समाज घटकांना न्याय देणारा पक्ष आहे. महिलांना समान संधी देण्यासाठी काँग्रेस पक्षाने यापूर्वीही अनेक महत्वाचे निर्णय घेऊन त्याची यशस्वीपणे अंमलबजावणीही केलेली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यातही महिलांना सहभागी करून घेतले होते.

दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन महिलांना राजकारणात मोठी संधी उपलब्ध करुन दिली. महाराष्ट्रात काँग्रेस सरकारने हेच आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत केले. संरक्षण दलात महिलांना संधी देण्याचा निर्णयही राजीवजी यांनीच घेतला. महिला व मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देण्याचा निर्णयही काँग्रेसच्या सरकारनेच घेतला आहे.

देशाला पहिल्या महिला पंतप्रधानपदाचा मान इंदिराजी गांधी यांच्या रुपाने काँग्रेसने दिला तसेच पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने देऊन जगासमोर एक आदर्श घालून दिला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊन काँग्रेस पक्षाने महिलांना राजकारणात आणखी महत्वाची संधी देण्याचे पाऊल उचचले आहे, या निर्णयाबद्दल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांचे आभारही प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी मानले.

हे ही पहा: