कोरोना रुग्णवाढीला राज्यातील नेतेमंडळी हातभार लावत आहेत ?

 मुंबई – माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग झाला आहे.विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. सध्या त्या आपल्या मुंबईतील घरीच क्वारंटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पंकजा मुंडे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, “करोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे. चाचणी केली. लक्षणं आणि करोना दोन्ही आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी.”राजकीय नेत्यांच्या घरातील लग्नसोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. तेथून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत आहेत. याला राज्यातील नेतेमंडळी हातभार लावत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण बड्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती दर्शवलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय अनेक पक्षांचे छोटेमोठे कार्यक्रम देखील सुरु असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही ठिकाणी मेळावे देखील घेतले जात असल्याने सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

या नेत्यांना झाली आहे कोरोनाची लागण

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,आदिवासी मंत्री के. सी. पाडवी,ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर,खासदार सुप्रिया सुळे,आमदार सागर मेघे,आमदार राधाकृष्ण विखे पाटील,आमदार शेखर निकम, आमदार इंद्रनील नाईक,आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर),आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री दिपक सावंत,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील