माझ्यावर दबाव आणण्यासाठी भावाला पाठवली हद्दपारीची नोटीस; पडळकरांचा गंभीर आरोप

मुंबई – एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात यावं या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकार त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलत आहे. परंतु कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने अद्यापही संप मागे घेतला नाही.

३ आठवड्यांचा कालावधी उलटला तरी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करता आला नाही असा टोला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. ते म्हणाले, पहिवहन मंत्री अनिल परबांनी आपले अपयश झाकण्याकरिता, मी आणि सदाभाऊ, एस.टी कर्मचाऱ्यांचे डोके भडकवत आहोत, असे वारंवार आरोप केले. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत.

आता ते मुघलशाही पद्घतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देतायेत. त्याचा आम्ही विरोध व निषेध करतो.ज्या पद्धतीने राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत अधिकाऱ्यांमार्फत माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या भावाला बेकायदेशीरपणे सांगली जिल्हाबंदी केली आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

त्याच चालाखीचा वापर करत जर खरोखर मनापासून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला असता तर आज नक्कीच काही मार्ग निघाला असता पण ज्या पद्धतीने मुंबई मील कामगारांचा संप चिघळवला व शेवटी अनिर्णयीत परिस्थितीत आणून ठेवला आणि नंतर मील मालकांसोबत मिलीभगत करत जमिनी विकून करोडोची टक्केवारी गोळा केली होती. त्याच हेतूने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून विविध शहरातील करोडोच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा अनिल परबांचा डाव दिसतोय असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.