उत्तर प्रदेशात काय झालं हे तिथलं सरकार बघेल, इथे शेतकरी मरत आहेत त्यावर बोला – फडणवीस

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय जयंत पाटील यांनी जाहीर केला.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या या भूमिकेवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. कॅबिनेट बैठकीत लखीमपूर हिंसाचाराबाबत खेद व्यक्त केला हे ठीक. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्या कानी पोहोचला नाही का? त्यांचे कैवारी ते झाले नाहीत. अद्याप मदतीचा निर्णय घेतला नाही, असा खोचक टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

तर, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर भाजप आंदोलन करेल. उत्तर प्रदेशात काय झालं हे तिथलं सरकार काम करेल. इथे शेतकरी मरत आहेत. त्यावर हे काही बोलत नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केलीय.

हे पहा: