‘देवेंद्र फडणवीस वाघाच्या भुमिकेत काम करतात म्हणुन सामान्य जनतेला न्याय मिळतो आहे’
मुंबई – राज्यात विरोधी पक्ष मांजराच्या नव्हे तर वाघाच्या भुमिकेत काम करतो हे खऱ्या अर्थाने संपादक नसलेल्या शिवसेना नेते संजय राऊतांनी लक्षात घ्यायला हवं. कालच्या अधिवेशनात भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जेव्हा नक्कल केली यावर क्षणीच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जागे झाले. आणि बघता काय जोरदार हल्ला चढवत त्यांनी जाधवांना विधानसभेत माफी मागायला लावली. हे केवळ फडणवीस वाघांच्या भुमिकेत असल्यामुळेच जाधवांचा फडशा त्यांनी सभागृहातच पाडल्याचं देशवासियांनी पाहिलं. विरोधी पक्ष मांजराच्या भुमिकेत असता तर ठाकरे सरकारला सळो की पळो करून सोडलंच नसतं हे राऊतांनी लक्षात घ्यायला हवं असं भाजपनेते राम कुलकर्णी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पुढे कुलकर्णी म्हणतात, राज्यात विरोधी पक्ष मांजराच्या भुमिकेत काम करत असल्याची टिका संजय राऊत यांनी आपल्या दैनिकात संपादकिय लेखातुन केली. विरोधी पक्ष मांजराच्या भुमिकेत आहे का? वाघाच्या भुमिकेत काम करतो हे मागच्या दोन वर्षापासुन राज्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकरी पाहत आहेत. देवेंद्र फडणवीस वाघाच्या भुमिकेत काम करतात म्हणुन तरी सामान्य जनतेला न्याय मिळतो आहे. दोन वर्षात महाविकास आघाडीचा कारभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भुमिका कशी आहे?हे जनता पाहते. विरोधी पक्षाने सरकारच्या पावला पावलावर लक्ष ठेवले. कोरोना सारख्या संकटात महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या अनियंत्रित कारभाराचा फटका जनतेला बसला.
देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. या संकटात मढ्यावरचं लोणी खाल्याप्रमाणे केलेला भ्रष्टाचार विरोधी पक्षनेत्यांनी उघडकीस आणला. संजय राऊतांची भुमिका मुळातच महाभारतातल्या धृतराष्ट्राप्रमाणे आहे. स्वत:चं ठणकावुन सांगता ते केवळ पाप झाकण्यासाठी असंच म्हणावे लागेल. 100 कोटीच्या वसुलीत राज्याचे गृहमंत्री तुरूंर्गिांत आहेत, एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री राजीनामे देतात, एवढेच नव्हे तर अनेक मंत्र्यांचे कारनामे अवघ्या दोन वर्षात विरोधी पक्षांनी बाहेर काढले. महाविकास आघाडी सरकार केवळ वसुली सरकार हे सिद्ध झालं विरोधी पक्ष नेत्यामुळेच.
कुठल्याही प्रश्नाचं गांभीर्य सरकारला नाही. मराठा समाजाचं आरक्षण, ओबीसी समाजाचं आरक्षण केवळ सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गेले. म्हाडा परीक्षाचा पेपर फुटला. आरोग्य परीक्षाचा पेपर फुटला आणि सर्वात दुर्दैव म्हणजे उद्याच्या भारताचे नागरिक घडवणाऱ्या शिक्षक अर्थात टीईटी परीक्षेत झालेला घोटाळा. विरोधी पक्ष नेते खरंच मांजराच्या भुमिकेत असता तर एकही घोटाळा आणि कारनामे बाहेर आले नसते. तो वाघाच्या भुमिकेत काम करतो म्हणुनच सरकारच्या मनमानी कारभारावर पावलोपावली लक्ष अन्यथा ठाकरे सरकारने आतापर्यंत महाराष्ट्र राज्य विक्रीला काढले असते.
संपादकीय लिखाण करणारे संजय राऊत यांनी खऱ्या अर्थाने वर्तमान परिस्थितीचा निर्भिडपणे आढावा घेत लिखाण केले तर वाचकांचा भरोसा बसतो. स्तुतीपाठक लेखणी समाजाचं मन घडवणारी नसते. तु कर मारल्यावनी मी करतो रडल्यावानी अशी निती राज्यातील सरकारची आहे आणि त्यावर पांघरून घालण्यासाठी स्वत: मांजराच्या भुमिकेत काम करणारे त्यांच्या हिताचं रक्षण करतात. कालच्या हिवाळी अधिवेशनात सभागृहाबाहेर भाजपा आमदार निलेश राणे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना म्याव म्याव म्हणुन हिणवले. कदाचित राजकियदृष्ट्या योग्य अयोग्य यावर मंथन झाले पण वाघाच्या भुमिकेत काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्याचे समर्थन केले नाही. अर्थात त्यानंतर राणे विरूद्ध ठाकरे सामना सुरू झाला. मांजर, वाघ, बगळा, कावळे, पोपट असे सर्व प्राणी राजकारणाच्या तोंडी आणि लेखणीत येवु लागले. पण फडणवीस हे वाघासारखं काम करतात. हे देशांनी पाहिलं.
अधिवेशनात वीज प्रश्नावर मंत्री नितीन राऊत बोलत असताना आमदार भास्कर जाधव यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. वास्तविक पाहता आपल्या देशाच्या पंतप्रधानाची पवित्र सभागृहात बसुन आपणच नक्कल करतो हा मुर्खपणाचा कळस म्हणावा लागेल. पण काही लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नाचं देणघेणं काहीच नसतं. अंग विक्षेप हीच त्यांच्या राजकारणाची संस्कृती असते. जी संस्कृती भास्कर जाधवांच्या चालण्याबोलण्यात नेहमीच आढळते. कदाचित आपण वेगळं काही केल्यानंतर समोरून एवढा प्रतिकार होईल अशी कल्पना त्यांच्या मनात त्यांनी केली नसावी.पंतप्रधानांचा अंगविक्षेप त्यांच्या शब्दरूपी देहबोलीतुन बाहेर पडताच समोर बसलेले विरोधी पक्ष नेते ज्यांच्या अंगात वाघ संचारला क्षणात त्यांनी जाधवांच्या अंगविक्षेपाचा खरपुस समाचार घेतला.
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्यासारखे लढवय्ये फडणवीसांच्या सोबत मदतीला आले. शब्द प्रति शब्द हल्ला झाला. सभागृहाचे सभापती यांना अखेर ती गोष्ट मान्य करावी लागली. मंत्री जयंतराव पाटलांकडून आलेली प्रतिक्रिया त्यालाही उत्तर फडणवीसांनी दिलं. एकुणच काय प्रचंड खल आणि गदारोळ झाला. परिणाम भास्कर जाधवांचा अक्षरश: फडशा फडणवीसांनी पाडला. परिणाम काय तर जाधवांना अखेर सभागृहात जाहिर माफी मागावी लागली. कदाचित विरोधी पक्ष नेते मांजराच्या भुमिकेत असते तर संजय राऊत म्हणतात तसं घडलं असतं पण विरोधी पक्ष नेता वाघाच्या भुमिकेत काम करतो म्हणुनच अशा अंगविक्षेपी सत्ताधारी लोकप्रतिनिधीला चॉप बसतो हे नसे थोडके. शेतकरी राज्यात प्रचंड संकटात आहे.
अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान न भुतो न भविष्यति त्यालाही न्याय मिळवुन देण्यासाठी विरोधी पक्ष वाघाच्या भुमिकेत रस्त्यावर उतरला म्हणुन थोडी फार का होईना मदत करण्याच्या भुमिकेत सरकार आले. पण मढ्यावरचं लोणी खाण्याचा मोह वसुली सरकारच्या सत्ताधाऱ्यांना आवरला नाही. हेक्टरी दहा हजार रूपायांची घोषणा सरकारने केली पण प्रत्यक्ष हातावर केवळ 75 टक्के रक्कम दिली. उर्वरीत 25 टक्के रक्कम सत्ताधाऱ्यांनी वाटुन घेतली. यावर संजय राऊत एक शब्द लिहित नाहीत ना तोंडांनी बोलत नाहीत. भाजप तथा विरोधी पक्ष नेता वाघाच्या भुमिकेत काम करतो म्हणुनच महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो आहे अन्यथा ठाकरे सरकारचा मनमानी कारभार पाहता केवळ वसुली हेच उद्दिष्ट पाहता चांद्यापासुन बांद्यापर्यंत सरकारने महाराष्ट्र विकुन टाकला असता हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
राज्यात सुरू असलेला एस.टी.चा संप तीन महिन्यापासुन या सरकारला मिटवता येत नाही. त्या लोकांनी आत्महत्या केल्या. सर्वसामान्य प्रवाशांची परवड सुरू आहे. मुलांना शाळा, महाविद्यालयात प्रवासामुळे जाता येईना. असे असंख्य प्रश्न सरकारच्या समोर आवाहन म्हणुन उभे असताना यावर स्वत: संजय राऊत काहीच लिहित नाहीत. त्यांची पत्रकारिता मांजराच्या भुमिकेत का काम करत असावी? असे प्रश्न आता वाचकांना पडले आहेत. खरं तर पत्रकारांची लेखणी त्यातही संपादकांचा सल्ला जनहित आणि राज्य हित डोळ्यासमोर ठेवुन चालत असतो. पण अलीकडे वर्तमानकाळात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन काम करणाऱ्या माध्यमाचा वापर तु कर मारल्यावानी, मी करतो रडल्यावानी या उक्तीप्रमाणे केला जाणे हे अत्यंत दुर्दैव आहे.