‘भंगार मलिक दमच्या वार्ता करू नको, जावई दम विकताना पकडला गेला होता’

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्यांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे भाजप नेते आणि नवाब मलिक यांच्यातील शाब्दिक युद्ध दिवसेंदिवस वाढतच आहे.

मुंबईत क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी मलिक यांनी अनेक आरोप केले होते. त्यात त्यांनी मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि त्यांच्या मेहुण्यावरही काही आरोप केले होते. या आरोपांमुळे भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. एक हजार कोटी रुपयांचा हा दावा दाखल करण्यात आला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी त्याबाबतची माहिती दिली आहे. दरेकरांच्या या ट्विटला मलिक यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. आ देखें ज़रा किसमें कितना है दम, असं ओपन चॅलेंजच नवाब मलिक यांनी दिलं आहे.

या वादात आता भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी ट्विट करत नवाब मलिक यांचा खास शैलीत संचार घेतला आहे. ‘भंगार मलिक दमच्या वार्ता करू नको, जावई दम विकताना पकडला गेला होता’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.