‘मस्त पियो, खुब जियो हा या सरकारचा मंत्र’ मुनगंटीवारांचा घणाघात

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.

राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीनं राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे. दरम्यान ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित असल्याची घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय.

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. ‘मस्त पियो, खुब जियो हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे. कोरोनात सर्वसामान्यांना औषधांची गरज आहे. पण आम्ही दवा नही दाऊ देंगे, असं हे सरकार आहे. कष्टकऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी या सरकारला वेळ नाही. राजकारण करणे आणि दारुवाल्यांना प्रोत्साहन देणे. चंद्रपूरची दारुबंदी हटवली. वाईन प्रोत्साहन योजनेत 4 वर्षे आम्ही पैसे दिले नव्हते. ते पैसे यांनी कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक तणावातही दिले. यांनी दारुवर जो 300 टक्के कर होता तर दीडशे टक्क्यांवर आणला. असा घणाघात मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर केला आहे.

वीज स्वस्त असण्याचं कारण नाही, घरात वीज अंधार असला तरी चालेल. यातून शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही, उलट वाईन उद्योजकांनाच त्याचा फायदा होणार आहे. वाईन उद्योजक जे आहेत मी नाव घेणार नाही पण एका कंपनीचे बटिक आहेत. त्या कंपनीचं मी नाव घेणार नाही, पण त्या कंपनीची पोहोच एवढी आहे मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती कंपनी स्वत:ला साजेसे निर्णय घेऊ शकते, असा गौप्यस्फोट मुनगंटीवार यांनी केला आहे.