हिंगोली जिल्ह्यात भीषण पूर परिस्थिती, दिल्ली दौऱ्यातून वेळ काढत मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी

ठाणे : सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain)कोसळताना दिसत आहे. या पावसामुळे एकीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे काही ठिकाणी या पावसामुळं पूरस्थिती (Flood-Situation)निर्माण झाली आहे. रात्री हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अनेक गावांमध्ये झालेल्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक नागरिक अडकून पडले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये गावांमध्ये पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. या संपूर्ण पूर परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)लक्ष ठेवून आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली..काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे असेही निर्देश त्यांना दिले.