शेतकऱ्यांनी संयुक्त खतांची मात्रा पिकांना द्यावी, डी.ए.पी. चा हट्ट न धरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लातूर :- जिल्ह्यातील खरीप २०२१ हंगामातील मुग,उडीद व सोयाबीन या सलग क्षेत्रातील पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. आता रब्बी पिक पेरणीची वेळ आली असून काही प्रमाणात हरभरा पिकाची पेरणी सुरु झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी रासायनिक खते जिल्ह्यात उपलब्ध आहेत. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचा कल डी. ए.पी खताच्या वापराकडे दिसून येतो. त्यामुळे बाजारात डी. ए.पी ची मागणी वाढली आहे. मात्र, उपलब्ध असलेल्या संयुक्त खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने केले आहे.

बाजारात १०:२६:२६ , १५:१५:१५ ,१२:३२:१६ आणि २०:२०:००:१३ संयुक्त खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटश हि खते सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी करताना वरील संयुक्त खते पिकांना द्यावेत. हरभरा पिकासाठी एकरी १० किलो नत्र, २० किलो स्फुरद, १२ किलो पालाश देण्यासाठी १०:२६:२६ हे खत ७५ किलो वापरल्यास एकरी १हजार ७६५ रुपये किवा १५:१५:१५ हे खत ५० किलो, अधिक म्युरेट ऑफ पोटश ४० किलो, अधिक सिंगल सुपर फॉस्फेट ५० किलो वापरल्यास एकरी २ हजार ४९२ रुपये किवा डी.ए.पी. ७५ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटश एकरी २५ किलो वापरल्यास २ हजार ३५० रुपये खर्च येतो.

गहू कोरडवाहू ४०:२०:०० एकरी मात्रा देण्यासाठी २०:२०:००:१३ हे खत १०० किलो अधिक ५० किलो युरीयामधून दिल्यास एकरी २ हजार ७६६ रुपये तसेच बागायती वेळेवर गहू पेरण्यासाठी ४०:२०:२० हि मात्रा देण्यासाठी १०:२६:२६ हे खत ८० किलो अधिक युरिया ४३ किलो वापरल्यास एकरी २ हजार १०८ रुपये किवा डी.ए.पी १११ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटश १०० किलो अधिक युरिया ४३ किलो वापरल्यास एकरी ४ हजार ९४० रुपये खर्च येतो. यावरून डी.ए.पी खताऐवजी इतर संयुक्त खते वापरल्यास खर्चात बचत होते. आणि शिफारशीप्रमाणे मात्रा सुद्धा देता येते.

जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात पिकासाठी डी.ए.पी ऐवजी संयुक्त व इतर खतांचा वापर करावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.