नवाब मलिकांसाठी सगळं मंत्रिमंडळ रस्त्यावर पण राजेंच्या भेटीला एकही मंत्री नाही !

मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र आठ महिने उलटले तरी अजूनही त्या मागण्यांवर राज्य शासनाने कोणतीच अंमलबजावणी केलेली नाही. ठाकरे सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात आता असंतोष वाढू लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे २६ फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत. खरतर मराठा समाजाच्या मागण्या 15 दिवसात मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नसल्याचे चित्र आहे.

संभाजीराजे यांना आता संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळत आहे. राजकीय नेते देखील राजेंच्या भेटीला आझाद मैदानावर हजेरी लावत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीतील एकही मंत्री आझाद मैदानावर न फिरकल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे अनेक आरोप असणाऱ्या नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ राज्याचे सर्व मंत्रिमंडळ रस्त्यावर पाहायला मिळाले मात्र दुसरीकडे मराठा आमचे प्रश्न घेऊन उपोषण करणाऱ्या संभाजीराजेंच्या भेटीला एकाकी मंत्री वा सरकारचा बडा नेता फिरकला नसल्याने आंदोलकांत संताप पाहायला मिळत आहे.