‘या’ तारखेपासून मिळणार देशभरातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा धोका हळूहळू कमी होत असताना कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉन मात्र हातपाय परसतो आहे. अशा परिस्थितीत DGCIकडून लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन आपातकालीन स्थितीत मान्यता देण्यात आली आहे. त्यातच शुक्रवारी नाताळ आणि स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बूस्टर डोसबद्दल महत्त्वाची घोषणा केली. १० जानेवारीपासून देशभरातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस दिला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनाही वैद्यकीय सल्ल्याने बूस्टर डोस घेण्याची परवानगी असेल असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित केले. कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारांची वाढती प्रकरणे पाहता लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.पीएम मोदी म्हणाले, ‘ज्या बालकांचे वय 15 ते 18 वर्षे आहे, त्यांच्यासाठी आता देशात लसीकरण सुरू होईल. 2022 मध्ये, 3 जानेवारी, सोमवारपासून सुरू होईल. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांबद्दलची चिंता पालकांची चिंता कमी होईल असं ते म्हणाले.

‘ज्येष्ठ नागरिकांना मिळणार बुस्टर डोस’

पंतप्रधान म्हणाले, ‘सह-विकार असलेल्या 60 वर्षांवरील नागरिकांसाठी, त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना लसीच्या खबरदारी डोसचा पर्याय उपलब्ध असेल. हे देखील 10 जानेवारीपासून उपलब्ध होईल. पीएम मोदी म्हणाले, ‘आज भारतातील 61 टक्क्यांहून अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. त्याचप्रमाणे, सुमारे 90 टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचा एकच डोस देण्यात आला आहे.

‘आरोग्य कर्मचारीही घेतील अतिरिक्त डोस’

ते म्हणाले, ‘आपल्या सर्वांचा अनुभव आहे की जे कोरोना योद्धे, आरोग्यसेवा आणि आघाडीवर कार्यरत आहेत, त्यांचे या लढ्यात देश सुरक्षित ठेवण्यात मोठे योगदान आहे. आजही ते आपला बराचसा वेळ कोरोना रुग्णांच्या सेवेत घालवतात. त्यामुळे सावधगिरीच्या दृष्टिकोनातून, आरोग्यसेवा आणि फ्रंटलाइन कामगारांसाठीही लसीचा खबरदारी डोस सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ते 2022 मध्ये 10 जानेवारी, सोमवारपासून सुरू होईल.

ते म्हणाले की भारताने यावर्षी 16 जानेवारीपासून आपल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली. देशातील सर्व नागरिकांच्या सामूहिक प्रयत्न आणि सामूहिक इच्छाशक्तीमुळेच आज भारताने लसीच्या 141 कोटी डोसचे अभूतपूर्व आणि अत्यंत कठीण उद्दिष्ट पार केले आहे. कोरोना या जागतिक महामारीशी लढण्याचा आतापर्यंतचा अनुभव असे दर्शवितो की, वैयक्तिक पातळीवर सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे हा कोरोनाशी सामना करण्याचा उत्तम मार्ग आहे.