म.फुले आणि अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्या – रामदास आठवले  

मुंबई  – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज सकाळी संसदेत भेट घेतली. यावेळी उभयनेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत रिपब्लिकन पक्षाची युती करण्यात यावी या रिपाइं च्या प्रस्तावावर ही चर्चा करण्यात आली.

महात्मा ज्योतिबा फुले हे स्त्रीशिक्षणा चे उद्गाते प्रणेते महापुरुष आहेत.त्यांनी स्त्रीशिक्षण; दलितांचे शिक्षण, दलित आणि स्त्रियांच्या मानवी हक्क,शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले काम युगप्रवर्तक आहे.भारत राष्ट्र म्हणून महापुरुषांच्या विचारांमुळे माजबुतीने प्रगती करीत आहे. महत्मा फुलेंचे कार्य अजोड आणि सदैव प्रेरणादायी आहे. महात्मा फुले यांच्या युगप्रवर्तक कार्याचा भारतरत्न ‘किताब देऊन गौरव करण्यात यावा याबाबतचे पत्र आज रामदास आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे.

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रात आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत अभूतपूर्व योगदान दिले आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जागतिक स्तरावर गाजलेले आणि अखिल मानवजातीला प्रेरणादायी साहित्य आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा भारतरत्न या किताबाने गौरव झाला पाहिजे.यामागणीचे पत्र  रामदास आठवले यांनी आज गृहमंत्री अमित शहा यांना दिले.

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप ने आरपीआय सोबत युती करून काही जागा सोडाव्यात. भाजप आरपीआय युती झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपला आरपीआयमुळे मोठे यश मिळविता येईल अशी भूमिका रामदास आठवले यांनी अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडली आहे.