सरकारचा आणि सत्तेचा विचार हा जनतेसाठी झाला पाहिजे – छगन भुजबळ

नांदेड :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार (Sharad Pawar) हे दूरदृष्टी असलेलं नेतृत्व असून देशातील प्रत्येक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहे. देशातील प्रत्येक घटकाचा विचार करणारे पवार साहेब विश्र्वगुरु आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्रित राहून काम करावे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व समता परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेऊन उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.कमलकिशोर कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष हरिराम भोसिकर, शहराध्यक्ष डॉ. किशोर कदम, बापू भुजबळ, ॲड.सुभाष राऊत, संघरत्न गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, खा.शरद पवार साहेब यांच्याकडे दूरदृष्टी आहे. त्यांनी देशातील आणि राज्यातील ओबीसी, अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. शासन कारभार करतांना सरकारचा आणि सत्तेचा विचार हा जनतेसाठी झाला पाहिजे. पवार साहेबांनी आपल्या सत्तेच्या कार्यकाळात सर्व जनतेला न्याय दिला. त्यांच्या हिताची जोपासना केली. त्यांना अधिक ताकद यापुढील काळातही आपल्याला द्यायची आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँगेस  पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित काम करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.