राजकीय बुद्धिबळाच्या खेळात राज्यपालांची एन्ट्री; कोश्यारी अनेक महत्वाचे निर्णय घेणार 

 मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बंडखोर शिंदे गटाच्या व्यूव्हरचनेला निष्पभ्र करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत.या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेच्या दोन गटात मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.

दरम्यान,  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. चार दिवसानंतर त्यांनाही डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज्यपाल आता सक्रिय होणार आहेत. राज्याची राजकीय परिस्थितीचा राज्यपाल आढावा घेतील. त्यानंतर ते काही निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी त्यांना एक पत्रं लिहिलं आहे. त्या पत्रावरही राज्यपाल काही निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमके कोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. संध्याकाळपर्यंत राजभवनातून काही तरी निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.