आईमुळे जुळले हार्दिक अन् अक्षयाच्या प्रेमाचे धागे, वाचा त्यांची हटके लव्हस्टोरी

Hardeek Joshi Akshaya Deodhar Lovestory: ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणादा आणि पाठक बाई ही जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र आली आहे. २ डिसेंबर २०२२ रोजी हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) लग्नबंधनात अडकले आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, या दोघांची लव्हस्टोरी कधी आणि कशी सुरू झाली? त्यांचे अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज?

तर मंडळी हार्दिक आणि अक्षया यांचे ‘लव्ह-अरेंज मॅरेज’ आहे. गोंधळात पडलात ना… हार्दिक आणि अक्षया यांचे एकमेकांवर प्रेमही आहे आणि ते कुटुंबियांमुळेच जुळले आहे, म्हणून त्यांच्या लग्नाला ‘लव्ह-अरेंज मॅरेज’ असे म्हणणे वावगे ठरणार आहे.

नेमके कसे जुळले हार्दिक आणि अक्षयाच्या प्रेमाचे धागे?
‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हार्दिक जोशीने ‘हर हर महादेव’ या सिनेमाच्या निमित्ताने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात हार्दिकने त्याच्या आणि अक्षयाच्या प्रेमकहाणीचा खुलासा केला होता. हार्दिक म्हणाला की, ‘खरं सांगायचं तर तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर आमचं जुळलं. पाच वर्ष एकत्र असल्याने आम्ही खूप चांगले मित्र होतो. त्यामुळे कुटुंबच होतं आमचं. माझ्या डोक्यात याविषयी असा कधी विचार आला नव्हता. पण माझ्या आईमुळे मी तिच्याशी बोललो.’

‘माझी आई सारखी तिला विचारायची हे मला नंतर कळलं. आई तिला सांगायची की मला तू आवडतेस. मला आई म्हणालेली की आता मालिका संपलीय, मग तू दुसरी कोणती तरी मालिका घेशील, चित्रपट करशील, त्यामुळे आता घरात आहेस तर लग्नाचा विचार आधी कर. तुझं वय निघत चाललं आहे. माझी आई मला म्हणाली की, ‘तू तिच्याशी बोलून बघ, मी आधी एकदा तिला विचारलं आहे. मी तिला म्हटलं की ती जेवढं माझ्याशी बोलते ना तेही बंद करेल. तरी ती म्हणाली की एकदा बोलून बघ.’ असं हार्दिक म्हणाला.

मग आईच्या हट्टामुळे हार्दिकने अक्षयाला लग्नासाठी मागणी घातली. याबद्दल सांगताना हार्दिक म्हणाला, ‘मी माझ्या आयुष्यात सर्व गोष्टी आईसाठी करतो. त्यामुळे मी ठरवलं की एकदा बोलून बघूया. तेव्हा मी अक्षयाशी बोललो की माझ्या आईची इच्छा आहे आपल्या दोघांचं लग्न व्हावं. तेव्हा ती म्हणाली की ठीक आहे, फक्त तू एकदा घरी येऊन बोल.’

हार्दिक पुढे म्हणाला की, ‘मी तिच्या घरी जाऊन तिच्या आईला सांगितलं. त्यानंतर थेट दहा महिन्यानंतर तारखाच आल्या. मी शूटिंगसाठी चालत होतो, तेव्हा तिने मला कॉल करून मेसेज बघायला सांगितले. मला २० तारखेला सांगण्यात आलं की १० दिवसात साखरपुडा आहे. तिची अशी इच्छा होती की ०३ मेला लग्न करावं. कारण तिचा जन्म अक्षय्य तृतीयेचा.’ हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी अक्षय्य तृतीयेदिवशी ०३ मे ला साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मग २ डिसेंबरला मोठ्या धूमधडाक्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला.