कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आमचं काम अखंड सुरु राहील – मुख्यमंत्री

मुंबई – भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारच्या कामगिरीबाबत महाविकास आघाडीतील नेते समाधान व्यक्त करत आहेत तर विरोधीपाक्षातील नेत्यांनी ठाकरे सरकारची पोलखोल सुरु केली आहे.

वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला सुरक्षा आदी मुद्द्यांवर म्हणावी तेवढी चांगली कामगिरी सरकारला करता आली नसल्याची टीका विरोधक करत आहेत. तर कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या कामगिरीचा दाखला देत महाविकास आघाडीतील नेते स्वतःच्या सरकारचा बचाव करताना दिसून येत आहेत.

दरम्यान, सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीत आम्ही विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आमचं काम अखंड सुरु राहील. असे म्हणत महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त उद्धवठाकरे यांनी जनतेला धन्यवाद दिले आहेत.