मी मरण पत्करेन पण शरण जाणार नाही; संजय राऊत यांची डरकाळी

नाशिक – राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेनेतून बंडखोर आमदारांना सोबत घेऊन भाजपशी (BJP) युती करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेतील बंडाचे धक्के अजूनही पक्षाला बसत असताना विरोधक देखील शिवसेनेवर रोज निशाणा साधताना दिसत आहेत. तसेच बंडखोर आमदार आणखी काही आमदार आणि खासदार सोबत येतील असा दावा करत आहेत.

या पार्श्वभूमीवर आता  शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमधील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात  एकनाथ शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे. धण्युष्यबान आमचा पंचप्राण आहे,तो शिवसेनेचाच राहील.आम्ही जाऊन लाल किल्ल्याला सलाम मारत नाही रायगडाला सलाम मारतो. दिल्लीकरांना ही मुंबई तोडायची आहे म्हणून शिवसेना तोडली. मुंबई तोडा हा नजराणा घेऊन मुख्यमंत्री दिल्लीला गेले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

‘मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने उभा राहतो म्हणून माझ्यामागे तपास यंत्रणा लावल्या आहेत. हा संजय राऊत घाबरणारा नाही. यंत्रणांचा वापर करून आमच्या लहान मुलींना बोलावता त्यांचा छळ करता. ईडी (ED) मागे लागली म्हणून मी खंजीर खुपसणार नाही. मी मरण पत्करेन पण शरण जाणार नाही,’ असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.