त्यांनी तीन पैकी एक उमेदवार मागे घेतला तर घोडेबाजार होणार नाही – फडणवीस

मुंबई – राज्यसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यातील वातावरण तापले असून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असा जोरदार संघर्ष यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून एका बाजूला आपले उमेदवार विजयी होतील असा दावा करत असताना भाजपकडून देखील आपले उमेदवार सहज विजय मिळवतील असा दावा केला जात आहे.

आज भाजपच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्हाला घोडे बाजार करायचा नाही. आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी तीन पैकी एक उमेदवार मागे घेतला पाहिजे तर घोडेबाजार होणार नाही. जरी त्यांनी उमेदवार कायम ठेवला आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. सदसदविवेक बुध्दीने काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत. जे लोक दिल्लीत बसलेले आहेत, ते महाराष्ट्रासोबत नेहमीच बदल्याच्या भावनेने काम करतात. पीयूष गोयलेने केलेलं विधान आमच्या सर्व आमदारांनी आणि राज्याच्या जनेतेने लक्षपूर्वक ऐकलं आहे.

भाजपातर्फे तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goel) पुन्हा एकदा महाराष्ट्रातून निवडून राज्यसभेवर जात आहेत याचा आम्हाला आनंद आहे. त्यासोबत अनिल बोंडे (Anil Bonde) यांचा कृषीविषयक अभ्यास आहे. धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे सहकार क्षेत्रात मोठे काम आहे. या तिन्ही उमेदवारांचे अर्ज आम्ही भरले आहेत. मला विश्वास आहे की आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील.

दरम्यान,  देशातल्या 15 राज्यातील 57 जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.