आमदारांना मुंबईत घर मिळाले तर त्यात चूक काय? काही ठराविक आमदारच श्रीमंत आहेत – चतुर्वेदी 

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी एक मोठी घोषणा केलीय. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं (Home In Mumbai) अशी मागणी बुधवारी विधानसभेत शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

आमदारांसाठी आता मुंबईत 300 घरं बांधणार असल्याची घोषणा (Homes For Mla) मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असे ते म्हणाले. राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक घर मिळावं, आमदार असेपर्यंत.. असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. त्यानंतर, आमदारांना कायमस्वरुपी घरे आपण देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केलं.

आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सोशल मिडीयावर सरकारवर टीका होऊ लागली आहे. आमदारांची कोट्यवधींची संपत्ती आहे, सोबतच काही आमदारांकडे 7 ते 8 घरं आहेत. अशातच त्यांना घरं का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, याउलट शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. आमदारांना मुंबईत घर मिळाले. तर त्यात चूक काय? काही ठराविक आमदारच श्रीमंत आहेत. त्यांचा टक्का फार कमी आहे. मात्र बहुतांशी आमदारांची आर्थिक स्थिती तशी नाही. अशा आमदारांना मुंबईत घर मिळालीत, तर त्यांची सोय होईल. मुंबईत येणाऱ्या आमदारांची आणि दिल्लीत येणाऱ्या खासदारांची राहण्याची सोय ही राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी असतेच. असं त्या म्हणाल्या.