आता शाळा सुरु केली तर मज्जा येणार नाही, मी शाळेत जाणार नाही; शाळा सुरु करण्याचा निर्णयाला पालक-विद्यार्थ्यांचा विरोध

पुणे : कोरोनामुळे 2 वर्षांपासून शाळा बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता हेच नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी आता अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या निर्णयाला पुण्यातील पालक आणि विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत पण आता शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला पुण्यातील पालक आणि विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. “शाळा सुरु करण्याचा निर्णय मला अजिबात आवडला नाही. आता शाळा सुरु केली तर बिलकुल मज्जा येणार नाही, आम्हाला मित्रांशी खेळता येणार नाही, गावी जाता येणार नाही. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातच शाळा सुरु करा.”; असं विद्यार्थी म्हणत आहेत.

तर, “;उन्हाळा खूप वाढला आहे, मुलांना उन्हाचा त्रास होईल. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातच शाळा सुरु करावी.”अशी मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान , “उन्हाळ्यात शाळा सुरु केली तर तो शाळेचा फील निघून जाईल, मुलांना एन्जॉय करता येणार नाही मामांचा गावी जाता येणार नाही.” त्यामुळे आम्ही या निर्णयाला पूर्ण विरोध करत असल्याचं देखील पालक म्हणत आहेत.

दुसरीकडे, 22 मार्च 2022 रोजी एक शासन निर्णय पारित केला आहे. त्यानुसार शाळा पूर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. बऱ्याच पालकांनी ऑनलाईन शिक्षणाचे तोटे होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत तर मुलांची गणित आणि भाषा विषयांमध्ये पीछेहाट होत असल्याचं निरीक्षण अनेक शिक्षकांनी देखील नोंदविले आहे. त्यामुळे या दोन महिन्यात शक्य होईल तेवढे नुकसान भरून काढू. असे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितलं आहे.