‘राजकीय विरोधक आहे म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कराल तर खपवून घेणार नाही…’

मुंबई  – आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत त्या घटना घडत असताना सत्ताधारी पक्ष वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर चर्चा बैठकीत झाली व रणनीती ठरवण्यात आली अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना दिली दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जात आहे. पुरोगामी विचार घेऊन पवारसाहेबांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली. तेव्हापासून यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी पुढे जात असतो. आमच्या पक्षात सर्व धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. घटना, कायदा, संविधानाला धरून देश आणि राज्य चालले पाहिजे या मताची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे जो काही बाऊ करतात त्याला काडीचा आधार नाही आम्ही पण अनेक वर्षे राज्यकर्ते म्हणून काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर ठेवण्याचे काम पवारसाहेबांनी केले आहे. सत्ताधारी पक्षाच्या पोटात दुखत असेल म्हणून ते अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे त्याच्याशी आमचा दुरान्वये संबंध नाही आम्ही आमच्या भूमिकेनेच पुढे जाणार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आपल्या नागरिकांबाबत चुकीचे घडले असेल तर कारवाई केली पाहिजे परंतु सत्ताधारी पक्षाचा असणारा उगीचच विरोधकांना त्रास देण्याचा आणि गोवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कुणीही सहन करणार नाही. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले होते त्यातून त्रासून राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. वास्तविक चुका असतील मग माझ्या किंवा कुणाच्याही असोत त्याच्यावर कारवाई करावी परंतु मुद्दाम कुभांड रचून कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. कुणालातरी पुढे करुन गुन्हा दाखल करायला लावणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आम्ही तर १९९९ ते २०१४ ते २०२२ असे साडेसतरा वर्ष सत्तेत काम केले आहे. आमच्या काळात विरोधक होते पण असा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे असा प्रयत्न कुणी केला तर जनता हे बारकाईने बघत असते त्यामुळे आम्ही हे सहन करणार नाही. जाणीवपूर्वक गोवण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न राजकीय विरोधक आहे म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी सरकारला दिला.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर बलात्काराची केस दाखल होईल अशी चर्चा आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता बलात्कार न करता गुन्हा दाखल करु शकता का? तर ही मोघलाईच लागलीय असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला. असे व्हायला लागले तर यावरून महाराष्ट्रात उठाव होईल. महाराष्ट्र शांत किंवा गप्प बसणार नाही. लोकांनाही कळते आहे की, कशापद्धतीने गोवण्यात येत आहे आणि इतक्या खालच्या पातळीवर राज्यातील राजकारण जाणार असेल आणि सरकारी यंत्रणांचा वापर होणार असेल तर आम्हालाही वेगवेगळ्या आयुधांचा वापर करता येईल. असा अन्याय होत असेल तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मूग गिळून बसलेलो नाही असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले आहे.

सभागृहात मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे की, तुम्ही तुमच्या समोर आमदार जितेंद्र आव्हाड यांची घटना घडूनही स्पष्ट भूमिका घेत नाही. यावर समर्पक उत्तर दिले नाही. याचा अर्थ कुठे तरी पाणी मुरते आहे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख मिळत आहे. आपण न्यायालयाला विचारु शकतो का? त्यांना तो अधिकार आहे तो ते वापरत आहेत. मात्र गेले सहा महिने झाले तारीखच मिळत आहे असेही अजित पवार म्हणाले.

आमचे नेते छगन भुजबळ यांनी सुरुवातीपासून व इतर नेत्यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. आज ५३-५४ टक्क्यांवर ओबीसी समाज आहे. वास्तविक मागील काळात जनगणना करण्याचा प्रयत्न केंद्रसरकारने केला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तर हजार चुका आहेत. त्याबद्दलची माहिती केंद्रसरकार देत नाही असे जाहीर केले होते. त्यामुळे जातीची आकडेवारी किती आहे हे कळले पाहिजे आणि सरकारला अर्थसंकल्पात दुर्लक्ष गरीब घटकाला वंचित घटकाला न्याय द्यायचा असेल त्यावेळी निर्णय घ्यायला उपयोग होईल.म्हणून तशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. त्या मागणीला अजित पवार यांनी समर्थन दिले आहे.