बुध्दगयेत महाराष्ट्र सदन प्रस्तावाला गती, उपमुख्यमंत्र्यांनीही लक्ष घातले 

मुंबई –माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली . त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 4  डिसेंबरला नागपुरात भेट घेतली. या भेटीत बुद्धगया येथे महाराष्ट्र सदन उभारण्याची मागणी केली. या सदनात सुमारे 500 बौध्द बांधव व भंतेजी एकाचवेळी थांबू  शकतील अशी व्यवस्था करावी असेही मागणी केली.

बडोले यांनी शिंदे व फडणवीस यांना सांगितले की, महाराष्ट्रातील बौद्ध उपासक उपासिका आणि बौद्ध भिक्खू मोठ्या प्रमाणात बुध्दगयेला जातात. तिथे  त्यांची निवासाची सोय होत नाही. ही गैरसोय  लक्षात घ्यावी.  ती दूर करण्यास तिथे दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्र सदन उभारावे अशी मागणी केली. या मागणीला उभय दोन्ही नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सामाजिक न्याय आणि वित्त खाते,सार्वजनिक व पर्यंटन खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्या प्रस्तावावर तातडीने बैठक घेण्याचेही आश्वासन देण्यात आले.

10 लाखांवर महाराष्ट्रातील पर्यंटकांची बुध्दगयेला भेट

महाराष्ट्रातून दररोज  मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध भिक्खू, बौद्धबांधव जातात. वर्षाचा हा आकडा  सुमारे दहा लाखांवर असतो. बुद्ध गया येथे तथागत गौत्तम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झाली. त्यामुळे संपुर्ण जगातील बौद्ध धर्मीयांसाठी हे स्थळ अतिशय पवित्र स्थान आहे. हे स्थळ भारतात असणे गौरवाची बाब आहे. मागील अनेक  वर्षापासून ही मागणी सातत्याने होत होती.  ही बाब लक्षात घेवून  माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या प्रस्तावावर काम सुरू केले. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 1 डिसेंबर रोजी आणि 4 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतली.  महाराष्ट्र सदन उभारण्यास लागणाऱ्या जागेच्या संदर्भात बिहारचे  मुख्यमंत्री नितिशकुमार  त्यांच्याशी चर्चा करण्याचेही या दोन्ही भेटीत ठरले.

लवकरच  बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर लगेच बैठक  लावण्याचे आश्वासन माजी  सामाजिक न्याय मंत्री  राजकुमार बडोले यांना दिले. तसेच अधिकाऱ्यांना तातडीने बैठक लावण्याच्या सूचना दिल्या.  त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील जे बौद्ध  उपासक, उपासिका आणि बौद्ध धम्म बांधव  मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध गया येथे जातात. त्यांची निवासाची सोय त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी एकावेळी सुमारे 500 उपासक, उपासिका आणि बौद्ध भिक्खु  राहु शकतील असा विश्वास   माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. बुध्दगयेतील महाराष्ट्र सदन हे बौध्द वास्तूनूसार जागतिक दर्जाचे व्हावे. या दृष्टीने डिझाईन तयार करण्याचे काम अनेक वास्तूविशारद स्वयंमस्फुर्तीने  करीत आहेत. त्या डिझाईनही राज्य सरकारकडे सोपविण्यात येतील. सरकारच्यावतीने देखील जागतिक दर्जाचा आर्किटेक्चरची सेवा या कामी घेण्यात येईल असेही संकेतही बडोले यांनी दिले.