गोव्यात काँग्रेस-गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांना घ्यावी लागली एकनिष्ठ राहण्याची घेतली शपथ

पणजी : काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीच्या सर्व ४० उमेदवारांनी शुक्रवारी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत एकजूट राहण्याची आणि काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याचे शपथ घेतली. राहुल गांधी यांनी त्यांच्या दिवसभराच्या गोव्याच्या दौऱ्यावर असताना सर्व उमेदवारांशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्येष्ठ नेते आणि निवडणूक रणनीतीकार पी चिदंबरम, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम दोनापावल येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये पार पडला.

काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिले, तर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि त्यांचे उमेदवार संतोष कुमार सावंत आणि दीपक कळंगुटकर यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिले.

दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, उमेदवारांना माहित आहे की ते गोव्यातील जनतेला उत्तरदायी आहेत आणि त्यामुळे भविष्यात युती पक्षातून पक्षांतर होणार नाही. ‘काँग्रेस हा भाजपला पर्याय आहे. जनतेने आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला असून आम्ही बहुमताने सरकार स्थापन करत आहोत. गोव्यातील जनता भाजपला घरी पाठवतील.’’ असे ते म्हणाले.

गिरीश चोडणकर म्हणाले की, मोदी आणि शहा यांच्या भांडवलदार मित्रांना लाभ देण्यासाठी भाजपने गोव्याचा नाश केला, मात्र आता काँग्रेस सरकार स्थापन करेल आणि गोव्याचे रक्षण करेल. “लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला मनापासून पाठिंबा दिला याबद्दल आम्ही आभारी आहोत. गोव्यातील जनता भाजपचा पराभव करून परिवर्तन घडवून आणेल, असा मला विश्वास आहे.’’ असे चोडणकर म्हणाले.

ते म्हणाले, भाजपचा पराभव करणे म्हणजे महागाई, भ्रष्टाचार, गैरप्रकार यांचा पराभव करणे आहे. “भाजप अशा सर्व वाईट गोष्टींमध्ये सामील होता, यासाठी त्यांचा पराभव करणे आवश्यक आहे.” असे चोडणकर म्हणाले.