पैठणमध्ये ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून स्वीकारला हिंदू धर्म 

पैठण – पैठण येथील नाथमंदिरात शनिवारी मंठा (जिल्हा जालना) येथील १२ कुटुंबातील ५३ महिला-पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन विधीवत हिंदुधर्म स्विकारला. धर्मजागरण विभाग व नाथवंशज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

याबाबत पैठण (Paithan) ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश कमलाकर शिवपुरी यांनी सांगितले की, ‘जालना जिल्ह्यातील मंठा येथील १२ कुटुंबातील ५३ ख्रिश्चन महिला पुरुषांनी पुन्हा हिंदु धर्मात येण्याची ईच्छा व्यक्त केली होती. ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू (Hindu) धर्मवापसी करता येईल का ? अशी विचारणा झाल्यावर पैठणच्या ब्राह्मण सभेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्याने धार्मिक विधी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार नाथमंदिरात शांतीब्रम्ह नाथ महाराजांच्या समाधीसमोर विधीवत धर्मवापसी सोहळा पार पडला. ‘साम’ने याबाबत वृत्त दिले आहे.

आणखी ६५ जणांची ‘धर्मवापसी’ होणार…

१२ कुटुंबातील ५३ ख्रिश्चन महिला पुरुषांनी धर्मांतर केल्यानंतर मंठा तालुक्यातील आणखी २२ ख्रिस्ती कुटुंबातील जवळपास ६५ महिला पुरुष ख्रिश्चन धर्माचा त्याग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ५ जानेवारी रोजी धार्मिक मुहूर्तावर पैठण येथील नाथमंदिरातच या धर्मांतर विधीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राह्मण सभेच्या पुढाकाराने ही ‘धर्मवापसी’ केली जाणार आहे. अशी माहिती पैठण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली.